गोल पोस्ट इतर राजकारण दसरा मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

दसरा मेळाव्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया

बारामती, ६ ऑक्टोंबर २०२२ : शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा काल बीकेसी मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरेंचं भाषण अंतिम टप्प्यात येताच एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले होते. एकनाथ शिंदे यांनी तब्बल दीड तास भाषण केलं. दरम्यान त्यांच्या या भाषणावरुन विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ‘काही भाषणं फारच लांबली, नको तिथे लांबली असं ते मिश्कीलपणे म्हणाले. ते बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

काल मी दोघांचेही भाषणे ऐकले आवडी निवडीसाठी ही भाषणं नव्हती. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून विचार ऐकण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर शिवसैनिक शिवाजी पार्कात येत होते. आता पिढ्या बदलल्या असून त्यांचे विचार ऐकण्यासाठी येत आहेत. तसेच सर्व महाराष्ट्राने हे मेळावे पाहिले. दोघांनीही एकमेकांवर टीका केली, मी दोघांच्याही भाषणावर टीका करणार नाही.

तसेच अजित पवार पुढे बोलतात की, कालच्या मेळाव्यात काहींना जेवायला मिळाले नाही, कुणाला नाष्टा, चहा मिळाला नाही. काहींना तर आपण कशाला आलो आहे हेच माहिती नाही. त्यांच्या भाषणाबद्दल आपल्यालाही माहिती आहे. तर आता कुणाला पाठिंबा द्यायचा हे जनतेने ठरवावे.

कुणाच्या पाठीशी उभे रहावे हे ज्याचे त्याने ठरवावे, कारण झेंडा शिवसेनेचा आणि अजेंडा राष्ट्रवादीचा असं मी कधी ऐकलं नाही. तर काल केलेली वक्तव्य हे राजकीय असल्यामुळे त्याला जास्त महत्त्व द्यायचं नसतं” असं अजित पवार म्हणाले आहेत.

पण महाराष्ट्रातील जनता आणि विशेषत: मतदारांनी, शिवसैनिकांनी आपण काय केलं पाहिजे, पुढील भूमिका काय असली पाहिजे, कोणाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, कोणाची मूळ शिवसेना आहे याचा विचार केला पाहिजे असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version