गोल पोस्ट क्रिडा विश्व आशियाई हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत

आशियाई हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत

पुणे, १ सप्टेंबर २०२३ : ओमानमध्ये सुरू असलेल्या आशियाई हॉकी ५एस विश्वचषक स्पर्धेत भारताने जपानचा ३५-१ असा पराभव करून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. भारताने मलेशियाचा ७-५ आणि जपानचा ३५-१ असा पराभव केला आहे.

दोन्ही सामन्यात भारतीय खेळाडूंनी एकूण ३५ गोल केले. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी विरोधी संघाला चेंडू मिळवण्याची संधी दिली नाही. चेंडू आपल्या ताब्यात ठेवून दुसऱ्या संघावर दबाव कायम ठेवला. पॉइंट टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवून भारताने सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. हॉकी विश्वात भारताने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने संपूर्ण देशाचा गौरव वाढवला.

भारत आणि जपान यांच्यातील एकतर्फी लढतीत भारताने जपानचा ३५-१ असा पराभव केला. भारताकडून मनिंदर सिंगने १० गोल केले. याशिवाय मोहम्मद राहिलने सात, पवन राजभरने पाच, गुरज्योत सिंगनेही पाच, सुखविंदरने चार, कर्णधार मनदीप मोरने तीन आणि जुगराज सिंगने एक गोल केला. भारताने आक्रमक खेळ करत जपानच्या संघावर कोणतीही दयामाया दाखवली नाही, पहिल्या ५ मिनिटांत ७ गोल केले. जपानसाठी मसाटाका कोबोरीने एकमेव गोल केला. या सामन्यात भारतीय संघाने गोलांचा वर्षाव केला आहे.

भारताने नेत्रदीपक कामगिरी करत मलेशिया आणि जपानला पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली. हे दोन मोठे सामने जिंकल्यानंतर भारताने एलिट पूल टेबलमध्ये १२ गुण घेतले आणि पाकिस्तानच्या मागे दुसरे स्थान मिळविले. भारताचा दुसरा उपांत्य सामना शनिवारी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version