गोल पोस्ट इतर माहिती 5G स्पेक्ट्रमचा लिलाव; सरकारला मिळाल्या १.५ लाख कोटी रुपयांच्या बोली, रिलायन्स...

5G स्पेक्ट्रमचा लिलाव; सरकारला मिळाल्या १.५ लाख कोटी रुपयांच्या बोली, रिलायन्स अग्रेसर

नवी दिल्ली, २ ऑगस्ट २०२२: 5G स्पेक्ट्रम लिलावात सरकारला सोमवारी सातव्या दिवशी १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली मिळाली आहे. भारतातील 5G ​​स्पेक्ट्रमचा पहिला-वहिला लिलाव २६ जुलै रोजी सुरू झाला. गेल्या सात दिवसांत झालेल्या बोलीच्या एकूण ४० फेऱ्यांनंतर लिलावाची बोली संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० फेऱ्यांनंतर मिळालेल्या बोलींचे तात्पुरते मूल्य १,५०,१७३ कोटी रुपये होते. लिलावाच्या सातव्या आणि शेवटच्या दिवशी ४३ कोटी रुपयांच्या बोली लागल्या.

२६ जुलै रोजी लिलावाच्या सुरुवातीच्या दिवशी १.४५ लाख कोटी रुपयांच्या बोली लागल्या. पहिल्या दिवशी स्पेक्ट्रम बोलीच्या चार फेऱ्या झाल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स जिओने सर्वाधिक आक्रमक बोली लावली आहे. 5G लिलावासाठी चार कंपन्या रिंगणात आहेत. या कंपन्या आहेत – रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, व्होडाफोन आयडिया लिमिटेड आणि अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओ बोलींमध्ये सर्वात आक्रमक ठरली असून त्यानंतर सुनील भारती मित्तल यांच्या नेतृत्वाखालील भारती एअरटेलचा क्रमांक लागतो.

चार कंपन्यांनी एकत्रितपणे २१,८०० कोटी रुपये ईएमडी म्हणून जमा केले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक रक्कम रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जमा केली होती, जी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमने १४,००० कोटी रुपये ईएमडी म्हणून ठेवले आहेत आणि त्यानंतर भारती एअरटेल लिमिटेडने ५,५०० कोटी रुपये ठेवले आहेत. Vodafone Idea Limited ने 5G लिलावासाठी २,२०० कोटी रुपये EMD म्हणून जमा केले आहेत तर अदानी डेटा नेटवर्क्सची EMD रक्कम १०० कोटी रुपये आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version