गोल पोस्ट समाजकारण भाजपचा समाजात फूट पाडण्याचा उद्योग: शरद पवार

भाजपचा समाजात फूट पाडण्याचा उद्योग: शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते की, देशात विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहत असताना, समाजात फूट पाडण्याचा उद्योग केंद्रातील भाजप सरकार करीत आहे, असा आरोप करून अशा मंडळीच्या हातात पुन्हा सत्ता देणे चुकीचे आहे. आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, “अल्पसंख्याक समाजाच्या अनेक समस्या असून, त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या देशात भाजपची सत्ता आहे. राज्यकर्त्यांनी समाजातील सर्व वर्गांना सोबत घेऊन जायचे असते, ही नेतृत्वाची जबाबदारी असते. देशातील सर्व लोकांना घटनेने समान अधिकार दिले असले, तरी त्यांच्या मनात शंका निर्माण केली जात आहे”, असा आरोपही पवार यांनी केला.

भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक कामानिमित्त सतत स्थलांतरित होत असतात. अशा लोकांच्या नोंदी मिळत नाहीत. अशा लोकांवरही पुरावे देण्याची वेळ भाजपने आणली आहे, असा आरोपही त्यांनी केला. पुढे ते म्हणाले की, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंकेच्या काही भागांत काही भारतीय राहत आहेत. त्यांना आपल्या देशात परत यावेसे वाटते. त्यांचा तो अधिकार आहे. परंतु, ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांना ते मान्य नसल्याचा आरोप पवार यांनी केला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या माध्यमातून मुस्लिमांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सरकार चालवताना अनेक अडीअडचणी असल्या, तरी अल्पसंख्याक विभागाला कोणतीही अडचण येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अल्पसंख्याक विभाग मला द्यावा, अशी इच्छा प्रदर्शित करणारे नवाब मलिक यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी देण्यात आली असून, ते अल्पसंख्याक समाजासाठी चांगले काम करतील, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!
Exit mobile version