गोल पोस्ट स्पॉटलाइट संतांच्या आवडीची झाडे लावण्याचे सिनेकलाकार सयाजी शिदे यांचं आवाहन

संतांच्या आवडीची झाडे लावण्याचे सिनेकलाकार सयाजी शिदे यांचं आवाहन

पुरंदर, दि. २१ जून २०२०: ‘झाडांचे महत्व मला पटलंय, म्हणून मी झाडे लावतोय. तुम्हाला पटल तर तुम्ही ही झाडे लावा’ असे आवाहन वृक्ष प्रेमी सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांनी केले आहे. आज पुरंदर मधील विविध ठिकाणच्या पालखी तळावर सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

हरितवारी उपक्रमाअंतर्गत आळंदी देवस्थान, सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या देवराई संस्थेच्या पुढाकारातून येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी तळाच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी शिंदे यांनी संताची शिकवण आंगिकरून वृक्षाची लागवड करण्याचे आवाहन लोकांना केले आहे.

याप्रसंगी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्थ अॅड.विकास ढगे, पुणे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, जेजुरी येथे नगराध्यक्षा सोनवणे, सीईओ पुनम शिंदे, मधुकर मोरे, शिवाजी मोरे, अजित मोरे, वाल्हेचे सरपंच अमोल खवले, जयश्री चव्हाण, सुर्यकांत भुजबळ, प्रा.संतोष नवले, पोपटनाना पवार, संदेश पवार, सुरेखा भुजबळ, चंद्रशेखर दुर्गाडे, दिपक कुमठेकर, वाल्हा औट पोस्टचे हनुमंत गार्डी, बी.व्हि.जगदाळे आदि उपस्थित होते.

सयाजी शिंदे पुढे म्हणाले कि, दरवर्षी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी शेतातील पेरणीची कामे उरकुन पांडुरंगाच्या भेटीला संतांच्या पालख्या
घेऊन निघत असतात. मात्र कोरोनामुळे यंदाची वारी सर्वांचीची चुकली आहे. याचे वैष्यम्य मानून न घेता प्रत्येक वारकऱ्यांनी आपल्या दारात, शेतात संतांच्या
आवडीचे वड, पिंपळ, चिंच, नांदरुक, उंबर आदि वृक्षांची लागवड करुन त्याचठिकाणी हरिनामाचा जयषोष करावा.

आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर ज्या-ज्या ठिकाणी पालखीचा मुक्काम असतो त्या ठिकाणी संतांच्या आवडीची पाच झाडे व विठ्ठलाच्या प्रतिकाची आठ झाडे प्रत्येक पालखीतळावर लावली जाणार असुन त्याचे संगोपनही केले जाणार आहे. आज लावलेली ही झाडे उद्या एखाद्या योग्याप्रमाणे या ठिकाणी वर्षानुवर्षे बसुन राहणार आहेत. वाल्हे सरपंच अमोल खवले व सुकलवाडीच्या सरपंच जयश्री चव्हाण यांनी सर्वांचे आभार मानले.

वाल्हेत होणार मोठा नामघोष..

आषाढी एकादशीच्या दिवशी राज्यभरातील सर्व वारकऱ्यांनी आपण लावलेल्या झाडाच्या शेजारी उभे राहुन विठ्ठल नामाचा जयघोष करावा. असे आवाहन
सयाजी शिंदे यांनी केले असून तसाच प्रेरणादायी कार्यक्रम आळंदी पंढरपुर पालखी मार्गावरील पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम असलेल्या वाल्हे येथील पालखीतळावर होणार असून आषाढी एकादशीच्या अगोदर येथील पालखी तळावर संतांच्या आवडीची सर्व झाडे या ठिकाणी लावली जाणार असून विठ्ठलनामाचा सर्वात मोठा जयषोष वारकरी व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीमध्ये केला जाणार असल्याचे अमिनेते सयाजी शिंदे व अॅड विकास ढगे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version