गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताचा एका डावाने दणदणीत विजय

ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटीत भारताचा एका डावाने दणदणीत विजय

कोलकाता: इडन गार्डनवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी कसोटीत विजय मिळवला आहे. याबरोबरच २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० असा विजयही मिळवला आहे.

या सामन्यात बांगलादेशचा दुसरा डाव १९५ धावांवर संपूष्टात आला. त्यामुळे त्यांना या सामन्यात पराभव स्विकारावा लागला. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात केवळ मुशफिकुर रहिमने ७४ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याला महमुद्दुलाहने ३९ धावा करत चांगली साथ दिली होती. पण तो दुखापतग्रस्त झाला. अन्य बांगलादेशच्या फलंदाजांना मात्र खास काही करता आले नाही. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ५ विकेट घेतल्या तर इशांत शर्माने ४ विकेट घेतल्या.

भारताने पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित करत सामन्यात २४१ धावांची मोठी आघाडी घेतली होती. भारताकडून विराट कोहलीने १३६ धावांनी शतकी खेळी केली. तर चेतेश्वर पुजाराने ५५ आणि अजिंक्य रहाणेने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली.
बांगलादेशकडून गोलंदाजी करताना अल-अमीन हुसेन आणि इबादत हुसेन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर अबू जायेदने २ विकेट्स आणि तैजूल इस्लामने १ विकेट घेतली आहे.
त्याआधी बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर संपूष्टात आला होता. या डावात बांगलादेशकडून शादमान इस्लाम(२९), लिटॉन दास(२४) आणि नईम हसन(१९) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. तर भारताकडून गोलंदाजीत इशांत शर्माने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तसेच उमेशने ३ आणि मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या.

error: Content is protected !!
Exit mobile version