गोल पोस्ट इतर राजकारण ‘धनुष्यबाण’ व ‘शिवसेना’ शिंदे गटाच्या गोटात; ठाकरे गटाचा शिवसेनेवरील दावा संपला

‘धनुष्यबाण’ व ‘शिवसेना’ शिंदे गटाच्या गोटात; ठाकरे गटाचा शिवसेनेवरील दावा संपला

मुंबई, १८ फेब्रुवारी २०२३ : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरून उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. बाळासाहेबांची शिवसेना आता शिंदे गटाची झाली आहे. ‘शिवसेना’ आणि पक्षाचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे एकनाथ शिंदे गटाकडेच राहील, असा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला. या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हाताबाहेर गेली असून, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे नाव आणि चिन्हाचे हक्कदार झाले आहेत.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे. शिवसेनेचे १३ खासदार, ५० आमदार आणि लाखो कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. लोकशाहीत बहुमत महत्त्वाचे असते. बहुमत आमच्यासोबत आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. हा सत्याचा विजय आहे. संविधानाच्या आधारे आपले सरकार स्थापन झाले आहे. हा निर्णय गुणवत्तेवर आधारित निर्णय आहे. यासाठी आम्ही निवडणूक आयोगाचे मनापासून आभारी आहोत.

शिवसेनेचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाने चोरले असून, ते केंद्रात परतत असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘बाळासाहेबांच्या विचारांची त्यांनी विक्री केली होती. राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे गहाण ठेवले होते. बाळासाहेबांचे विचार, धनुष्यबाण गहाण ठेवलेले आम्ही सोडविले. उद्धव हे बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक असतील; पण त्यांच्या विचारांचे आपण मालक आहोत. मोदीजींचे नाव देशात नाही तर जगभर ऐकू येत आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वेक्षणात मोदीजी जगात पहिल्या क्रमांकावर आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया देत हा लोकशाहीचा विजय असल्याचे सांगितले. सत्यमेव जयतेची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपची एकत्रित ताकद आता महाराष्ट्राच्या भविष्यासाठी नवी पहाट उघडणार आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version