गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ग्राम गौरव प्रतिष्ठान तर्फे खळद सासवड येथे बिजोत्सव संपन्न

ग्राम गौरव प्रतिष्ठान तर्फे खळद सासवड येथे बिजोत्सव संपन्न

सासवड, २४ एप्रिल २०२२ : आदरणीय पाणीबाबा विलासराव साळुंखे यांच्या स्मृति प्रित्यर्थ ग्रामगौरव प्रतिष्ठान तर्फे ‘खळद’ सासवड येथे बिजोत्सव साजरा करण्यात आला. “लोकं मोठाले हार घालून, बॅनर्स लावून स्मृति साजरी करतात पण त्यांच्या विचारांना कृतीत आणून त्यांची स्मृति साजरी करत नाहीत. आजचा बिजोत्सव ही एक कृती म्हणजेच त्यांना खरी आदरांजली आहे.” असे मत कल्पना आईंनी मांडले. या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन वैद्य. सोनाली यांनी केले. त्यासोबतच वैद्य कल्याणी यांचाही सहभाग सुध्दा कौतुकास्पद होता.

साळुंके यांच्या तीन पिढ्या आणि पाणी फाऊंडेशनचे कार्यकर्ते आज पाणी, निसर्ग, जैवविवधतेच्या अनेक कार्यात कार्यरत आहेत. त्यांच्या गोठामाळ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या दगडी माळरानात त्यांनी अक्षरशः जंगल उभे केले आहे. पाण्याचे संवर्धन करून या भूमीला सुजलाम सुफलाम करून इथे आरोग्यासाठी आयुर्वेद आणून त्या भूमीला आरोग्यभूमी हे सार्थ नाव दिले आहे. इथे अनेक प्रकारची अन्न औषधी पिकतात. इथल्याच जमिनीत पिकलेला आवळा व त्यापासून बनविला जाणारा च्यवनप्राश हे इथले वैशिष्ट.

त्यासोबत शेतमालाला इथे योग्य न्याय मिळावा म्हणुन इथे तेल लाकडी घाणा इत्यादि सर्व प्रोसेसरर्स आहेत. देशी, नेटीव्ह बियाणांचे संवर्धन व्हावे म्हणून आज पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खास करून महिलांनी बिबियाने आणले होते. वैशाली गाडगीळ या आयटी सेक्टर मध्ये निवृत्ती घेऊन हे काम करत आहे. येथील योगेश याने बीज मातांना एकत्र आणले होते. चिंचवडचे तरुण घोलप यांनी नेटीव्ह वृक्षबीज आणले होते. इला फाउंडेशन चे कार्यकर्ते पुस्तकं आणि वेगळ्याच जंगली बियांना घेऊन उपस्थित होते. श्री. देशमुख आणि श्री. प्रशांत यांनी पाणी परिषदेचे कार्य मांडले. काही महिला शेतकऱ्यांनी देखील याबद्दल स्वतःला बोलते केले.

याप्रसंगी यासर्वांना प्रमुख पाहुणे म्हणुन संबोधित करताना वैद्य संतोष सुर्यवंशी म्हणाले . “शेती, आयुर्वेद यांचा जीवनशैलीशी आणि बीज संवर्धनाशी कसा संबंध आहे? शेतकरी आणि महिलांनी शेतात सहभाग घेऊन औषधी विरहित आयुष्य कसे जगावे? आयुर्वेदीक शेती जाता जाता कशी सहजतेने करावी?”
“भविष्यात जंगलातुन मिळणाऱ्या मध, औषधी इत्यादी गोष्टी एक तर जंगले संपल्याने मिळणार नाहीत तर खाणीतील धातू औषधांना शुद्ध करून त्यावर संस्कार करण्यासाठीं सुध्दा लागणाऱ्या वनस्पती दुरापास्त होणारं आहेत. त्यांचे बीज संवर्धन करुन शेती नाही केली तर वैद्य, पेशंट आणि औषधी फॅक्टरीवाले वनोषधींच्या एक एक तोळ्याला सोन्याच्या भावात विकत घेऊन प्लॅटिनमच्या भावात विकतील,” अशा अनेक विषयांना वाचा फोडण्याचे आणि याकडे एक जीवनशैली म्हणून कसं बघायचं याबद्दल त्यांनी आपले मत मांडले .

शेवटी त्यांनी सासवडचे वैद्य प्रविण जगताप आणि वैद्य निरज कामथे यांचेही आभार मानले व त्यांच्यामुळे त्यांची इथे ओळख झाली त्याबद्दल वैद संतोष सुर्यवंशी यांनी त्यांचे पुनश्चः आभार मानले .


न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version