गोल पोस्ट महाराष्ट्र अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस, शेतकऱ्यांना दिलासा

अहमदनगर, २८ जुलै २०२३ : प्रदीर्घ विश्रांती नंतर नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोरदार बरसात केली. दिवसभर संततधार सुरू होती. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली आहे. सखल भागात पाणी साठल्याने पाण्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागली. नोकरदार व शाळकरी मुलांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

जुलै महिना संपत आला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त होते. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना गुरुवारच्या जोरदार पावसाने दिलासा मिळाला आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रस्तेही पाण्यात बुडाले आहेत.

रस्त्यातून वाट काढताना चालकांना कसरत करावी लागते आहे. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे असतानाच गुरुवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावत दिलासा दिला. जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरण पाणलोटात जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा धरण भरण्याच्या मार्गावर असून धरणातून विसर्गही सोडण्यात आला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version