गोल पोस्ट क्रीडा जसप्रीत बुमराहशिवाय भारताची क्रिकेट वर्ल्डकप टीम…

जसप्रीत बुमराहशिवाय भारताची क्रिकेट वर्ल्डकप टीम…

मुंबई, ३० सप्टेंबर २०२२ : एकीकडे भारतीय संघ एकापाठोपाठ एक टी-ट्वेंटी मालिका जिंकत आहे. अशातच भारताची चिंता कमी होताना दिसत नाही. भारतीय क्रिकेट संघाला टी-ट्वेंटी विश्वचषकाआधी खूप मोठा झटका बसला आहे. संघातील प्रमुख जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया येथे खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी विश्वचषक २०२२ मधून संघातून पडला आहे.

जसप्रीत बुमराहने दुखापतीनंतर नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेतून संघात पुरागमन केले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह खेळला नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघाचा हुकमी गोलंदाज जसप्रीत बुमरा हा पाठीच्या दुखापतीमुळे विश्वचषकासह पुढचे पाच ते सहा आठवडे खेळू शकणार नाही. या अगोदर रवींद्र जडेजा आणि आता जसप्रीत बुमराह या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघासाठी विश्वचषक जिंकणे, आता निश्चितच सोपे नसणार आहे.

दरम्यान कर्णधार रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या कालावधीतच खेळाडूंना दुखापत होतेच कशी? असा मिश्किल सवाल अनेक चाहते सोशल मीडियाद्वारे विचारत आहेत. आगामी महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर टी ट्वेंटी विश्वचषकाचा थरार राहणार आहे. तसेच सततच्या विश्रांतीमुळेच खेळाडूंचा फॉर्म जात असल्याचे अनेक दिग्गजांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत बुमराहची दुखापत भारतीय संघाची नक्कीच डोकेदुखी वाढवणारी आहे. यावरूनच चाहत्यांनी बीसीसीआय आणि कर्णधार रोहित शर्माबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या रविचंद्र अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, हर्षदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल

राखीव खेळाडू. :
मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version