गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा यापुढे कोरोना रोखण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवणे शक्य नाही; तहसीलदार पुरंदर

यापुढे कोरोना रोखण्यासाठी बाजारपेठा बंद ठेवणे शक्य नाही; तहसीलदार पुरंदर

पुरंदर, दि. ३० जून २०२०: केंद्र व राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे दुकाने, कंपन्या आता बंद करणे शक्य नाही. त्यामुळे यापुढे कोरोनाला अटकाव घालण्यासाठी खडक उपाय योजना अमलात आणणे शक्य नाही. त्यामुळे यापुढे बाजारपेठा बंद असणार नाहीत. अशी माहिती पुरंदरचा तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.

पुरंदर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्या कारणाने कडक उपाय योजना राबवाव्यात किंवा पुन्हा एकदा तालुक्यात लॉकडाऊन सुरू करावे, अशी मागणी लोकांकडून करण्यात येत होती. मात्र आता असे करणे शक्य नसून यापुढे लोकांनी आपली स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे शासनाच्या धोरणानुसार यापुढे लॉकडाऊन नाही तर अनलॉक सुरु होणार सुरु झाले आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन करता येणार नाही असे पुरंदरच्या तहसिलदारांनी स्पष्ट केले आहे.

पुरंदर मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने आता पन्नासचा आकडा पार केला असून तालुक्याच्या ग्रामीण भागात ही कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्याचे कनेक्शन हे पुणे किंवा मुंबई आहे. त्यामुळे जे लोक नोकरी करतात किंवा बाहेरगावी जातात अशा लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांनी घरातील किंवा गावातील लोकांशी संपर्कात न येता आपली कामे करावीत.

प्रत्येकाने मास्क वापरायला हवे आहेत. सामाजिक अंतर राखायला हवे. दुकानदारांनी आपल्या दुकानात गर्दी होणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे. दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवायला हवे. त्याचबरोबर दोन ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स राहील याबाबतची काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे. आता जर कोरोना रोखायचा असेल तर आपली काळजी आपणच घेणे गरजेचे आहे. शासन अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे पुन्हा लॉक डाऊन असणे शक्य नाही. प्रशासनाच्यावतीने गावातून सरप्राईज व्हीजीट दिली जाईल.

यावेळी ज्या दुकानातून किंवा अस्थापनातून सोशल डिस्टन्स पाळले जाणार नाही किंवा कोरोना प्रतिबंधासाठी उपाय योजना केल्या जाणार नाहीत अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. त्यामुळे यापुढे लोकांनी काळजी घ्यावी. ज्या गावातील लोक कामानिमित्त किंवा नोकरीनिमित्त पुण्याला सतत जात असतील त्या घरातील लोकांनी स्वतः काळजी घ्यावी. त्या घराच्या शेजारी लोकांनी सुद्धा काळजी घ्यावी त्या घराशी असलेला संपर्क कमी करावा जास्त गरज असेल तेव्हाच संपर्क ठेवावा, तोही दुरुनच. विनाकारण कोणीही अशा लोकांशी गप्पा मारत बसू नका. त्यामुळेच कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होत आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आता आपल्याला सर्व दुकाने, शॉप ही चालू ठेवावे लागणार आहेत. आपण आता दुकाने बंद करू शकत नाही. कंटेनमेंट झोन वगळता इतर कोठेही काही बंद करू शकत नाही, असे पुरंदरच्या तहसिलदार रूपाली सरनोबत यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version