गोल पोस्ट इतर माहिती सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संदेश

सर्व ज्येष्ठ नागरिकांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संदेश

पुणे, ९ सप्टेंबर २०२० : बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच नागपंचमी दिवशी आपल्या ९९ व्या वर्षात पदार्पण केले. नुकतेच आपल्या या तंदुरूस्तीचे कारण सांगताना त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना एक संदेश दिला आहे.

करोनाचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,‘मानव जातीवर अशी अनेक संकटे यापूर्वीही आलेली आहेत. परंतु त्या त्या वेळी समाजाने धैर्याने त्याचा सामना केला. मी स्वत: प्लेगच्या तब्बल पाच साथी अनुभवल्या. अतिसार, घटसर्प, ‘स्वाइन फ्लू’ हे सगळे पाहिले. या प्रत्येक वेळी काळजी घेतली, पण भीतीने पछाडले असे कधी झाले नाही आणि तसे होऊनही दिले नाही.

जगण्यावरचे प्रेम, श्रद्धा निरंतर असू द्या. त्यातली ऊर्जा वाहती ठेवा. असे केले तरच ते जगणे आनंदी होईल.’
शताब्दीला अवघी दोन घरे बाकी असण्याचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले, ‘तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्यात दडलेल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला जिवंत ठेवा. मी आजही या वयात जेवढा धीरगंभीर, चिंतनशील, स्थितप्रज्ञ वाटतो तेवढाच खोडकर, थट्टेखोर आणि दंगेखोर देखील आहे. मी जसे वाचन-संशोधन करतो तसेच पत्तेही खेळतो.

हातात असलेले ‘पुलं’चे ‘खिल्ली’ पुस्तक दाखवत, हे असे आनंद देणारे साहित्यही वाचतो. आनंदाने जगणे ही देखील एक कला आहे असे ते म्हणाले. कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार, ती चुकणार नाहीत. मरणावर विजय मिळवा, जगणे सुसाह्य होईल.

मी एवढया प्रदीर्घ आयुष्यात एकदाही आजारी पडलो नाही. याचे रहस्य माझ्या शरीरापेक्षा या विचारांमध्ये असावे. आजवर सतत आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहिलो. माझा भवतालही सतत हसता, आनंदी ठेवला. या प्रदीर्घ वाटचालीचे श्रेय कदाचित या ‘चैतन्या’लाच असेल!’

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version