गोल पोस्ट कृषी पुरंदरचा सीताफळ उत्पादक तोट्यात…..

पुरंदरचा सीताफळ उत्पादक तोट्यात…..

पुरंदर, दि. ९ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवुन देणारे पीक म्हणून सिताफळकडे पाहिले जाते. कोरोनामुळे सीताफळाची मागणी घटल्याने व बाजार पेठा बंद असल्याने, पुरंदर मधील शेतकऱ्यांची यावेळी “सीताफळाची बाग” तोट्यात गेली आहे.

पुरंदर तालुक्यात सर्वच शेतात शिताफळाच्या फळ बागा पहायला मिळतात. पुरंदर मधील वातावरण हे सीताफळाच्या उत्पादनासाठी अनुकूल आहे. सिताफळ हे पुरंदरकरांचे पारंपारिक व नैसर्गिक पीक आहे. डोंगर – दऱ्यातून अनेक सीताफळाची झाडे पाहायला मिळतात. त्याच बरोबर तालुक्यातील हजारो एकरवर शेतकऱ्यांनी शिताफळाची लागवड केली आहे. जवळच असणारी पुण्याची बाजार पेठ त्याच बरोबर मुंबईतून सीताफळला असणारी मागणी व मिळणारा चांगला बाजारभाव यामुळे पुरंदर मधील बहुतेक सर्वच गावातुन सिताफळाच्या भागांची लागवड झाली आहे. त्या भागात बहुतेक करून फळबागांना उन्हाळी बहार धरला जातो. जून महिन्यात सुरू होणारी तोडणी ऑगस्ट पर्यंत सुरू असते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो. मात्र सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पुणे आणि मुंबई मधील अनेक बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळत नाही. तसेच लोकांकडूनही सीताफळाची मागणी फार कमी आहे. त्यामुळे शेतातील सिताफळ न तोडणेच शेतकऱ्यांनी पसंद केले आहे. त्यामुळे पुरंदर मधील सीताफळ उत्पादक शेतकरी यावर्षीचा हंगाम तोट्यात गेल्याचे म्हणत आहेत.

दरवर्षी, सीताफळाचा उन्हाळी बहार हा आम्हाला चांगले उत्पादन मिळवून देतो. मात्र, सध्या कोरोना असल्यामुळे सीताफळाची मागणी अत्यंत कमी झाली आहे. सिताफळ खाल्ल्याने लहान मुलांना थोडीफार सर्दी झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे लोकांनाही सीताफळ खाण्याकडे पाठ फिरवली आहे. उगीच त्रास नको.  म्हणून लोक आता या सीताफळ खरेदीकडे येताना दिसत नाही. व्यापारी सुद्धा आता सिताफळ पाठवू नका, असा निरोप पाठवत आहेत. त्यामुळे या वर्षीचा सिताफळ हंगाम वाया गेला आहे. आम्ही तर आता सिताफळ तोडण्याचे ही बंद केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

error: Content is protected !!
Exit mobile version