गोल पोस्ट महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने ८ ऑगस्टला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने ८ ऑगस्टला पुरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा

पुणे ५ ऑगस्ट २०२४ :  गेल्या दोन, तीन आठवडयांपासून पुणे शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पवसामुळे मुळा – मुठा नदी काठाच्या अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक गोरगरीब कुटूंबियांचे संसार उघड्यावर पडले असून लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचारकरता पुरामुळे बाधीत झालेल्या अंदाजे दहा हजार कुटूंबाना त्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई देण्यात यावी; तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला २५ हजार रुपयांची मदत त्वरीत देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने येत्या गुरूवार दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिका दरम्यान ‘पुरगस्तांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शरहाराध्यक्ष संजय सोनवणे
यांनी या विषयी माहिती दिली. यावेळी प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, शाम सदाफुले आदी यावेळी उपस्थित होते.   

संजय सोनवणे म्हणाले, गेल्या अनेक आठवड्यांपासून पुणे शहरात सरासरी पेक्षा जास्त पासून होत आहे. यामुळे पुणे जिल्हयातील सर्व धरणे ९० टक्के भरली आहेत. तसेच खडकवासला धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठी रहाणाऱ्या नागरी वस्त्यांत पाणी शिरत आहे. पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा आयुक्त पुणे आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या समन्वयाच्या अभावी पुणे शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधीत झाली आहे. मात्र, शासनाकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. आगामी काळात देखील या नदी काठाच्या जनतेच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. या पार्श्वभूमीवर पुरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्यावतीने येत्या येत्या ८ ऑगस्टला सकाळी ११ वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कचेरी ते महानगरपालिका दरम्यान ‘पुरगस्तांचा आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.      

परशुराम वाडेकर ते म्हणाले, पुणे शहरामध्ये रस्त्यांची चाळण झाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे सगळे पुणेकर हवाल दिल झाले आहेत. नदीसुधार योजनेमुळे नदीपात्राची रूंदी कमी झाली आहे. मेट्रो मार्गाचे बांधकाम, नदीमध्ये राडारोडा टाकणे मनपाची विविध विकास कामे, नदीपात्रातील अतिक्रमणे, नाल्यावरील अतिक्रमणे यामुळे यामुळे नदी पात्रातील पाणी नागरी वस्तीत शिरत आहे.  पूर्वी ९० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग केल्यावर येणारा पुर आता २८ हजार क्युसेस पाणी सोडल्यावर येत आहे. वरील सर्व प्रश्नांच्या मुळाशी जावून उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

आक्रोश मोर्चाच्या मागण्या 

१. पुरग्रस्तांना त्यांच्या झालेल्या नुकसानीची संपूर्ण भरपाई देण्यात यावी. तत्पूर्वी प्रत्येक कुटूंबास रू. २५,०००/- तातडीची मदत देण्यात यावी.

२. पुरस्थिती निट न हताळलेल्या संबंधीत अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे.

३. पुर येण्यास कारणीभूत ठरणारी नदी, नाले या वरील सर्वप्रकारची अतिक्रमणे तात्काळ काढून टाकण्यात यावीत.

४. पुररेषा (रेडलाईन, ब्लू लाईन) नव्याने आखण्यात यावी.

५. पुणे शहराची आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करून तिची सर्व सामान्य माणसापर्यंत माहिती पोहचविण्याची व्यवस्था करावी.

६. पुरग्रस्तांचे खोटे पंचनामे करणारे अधिकारी आणि खोटया लाभार्थ्यांची चौकशी करून कारवाई करावी.

७ . शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे वाहतुक पोलीस पुणे मनपा आणि या विषयातील तज्ञांची एखादी समिती नेमुण कायम स्वरूपी उपाय योजना करण्यात यावी.

८. पुणे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये कमी व्यासाच्या ड्रेनेजलाईन्स असल्यामुळे पावसाळयात ड्रेनेज तुंबुन रस्ते जलमय होतात. तेथे नव्याने मोठया व्यासाच्या ड्रेनेजलाईन टाकण्याचे काम करण्यात यावे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील

error: Content is protected !!
Exit mobile version