किल्ल्यांनी जपला… ऐतिहासिक वारसा

भुईकोट किल्ला

“अहमदनगरजवळचा हा भुईकोट किल्ला हा हुसेन निझामशाह यांनी इ.स. १५५३ साली बांधण्यास सुरवात केली. चांदबिबीने जुलै इ.स. १६०० मध्ये युद्धात किल्ला लढवला. परंतु मोगलांनी तो जिंकला. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी मोगलांकडून विकत घेतला. इ.स. १७९७ पेशव्यांनी शिंदे घराण्याच्या ताब्यात दिला. १२ ऑगस्ट इ.स. १८०३ ला तो इंग्रजी सत्तेसाठी जनरल वेलस्लीने जिंकला.”

त्यानंतर १५ व्या शतकाच्या शेवटी, इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे करण्यात आले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने मे, इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव देण्यात आले. असे अभ्यासक सांगतात. इ.स. १४९४ मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चांदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे इ.स. १६३६ पर्यंत टिकली. मोगल बादशहा शाहजहानने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. १७५९ साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला, तर इ.स. १८०३ साली ब्रिटिशांनी अहमदनगरवर विजय मिळवला.

इ.स. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉ. पी.सी. घोष इत्यादी राष्ट्रीय नेते नगरमधील भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच किल्ल्यात लिहिला. या ग्रंथाची काही हस्तलिखिते आजही येथे पाहण्यास मिळतात. याच किल्ल्यात डॉ. प्रफुल्लचंद्र घोष यांनी ’हिस्ट्री ऑफ एन्शंट इंडियन सिव्हिलायझेशन’ हा ग्रंथ शब्दबद्ध केला.

अहमदनगर शहरात राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑफ पाकिस्तान व मौलाना आझाद यांनी गुबार – ए – खातिर हे ग्रंथ लिहिले. इ.स. १९४७ ला किल्ला भारत सरकारच्या सैन्यदलाच्या ताब्यात देण्यात आला.

मनमाड – दौंड रेल्वेमार्गावर अहमदनगर येथे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे. स्टेशनाजवळच अहमदनगर शहर आहे. शहराच्या पूर्व दिशेला प्रस्तुत भुईकोट किल्ला आहे. अहमदनगरहून भिंगारला जाणार्‍या अहमदनगर पालिका परिवहनच्या बसेस किंवा शेअर ऑटोने किल्ल्याकडे जाता येते. या किल्ल्याला भिंगारचा किल्ला असेही नाव आहे. शहरात अहमदनगरच्या किल्ल्याखेरीज, रेणुकामाता मंदिर (केडगांव) व चांदबीबी महल अशी काही ऐतिहासिक स्थळे आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा