गोल पोस्ट क्रीडा ईशांत शर्मासह २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

ईशांत शर्मासह २९ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२०: क्रीडा मंत्रालयाच्या चयन समितीने आज अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांचा देखील समावेश आहे. यामध्ये २९ खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली आहे. पुरुष रिकर्व्ह आर्चर अतानू दास, महिला हॉकीपटू दीपिका ठाकूर, क्रिकेटपटू दीपक हूडा आणि टेनिसपटू दिविज शरण यांचीही या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. निवड समितीच्या बैठकीनंतर अधिकृत सूत्रांनी ही माहिती पीटीआयला दिली.

३१ वर्षीय इशांतने आतापर्यंत भारतासाठी ९७ कसोटी आणि ८० एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या नावावर ४०० हून अधिक आंतरराष्ट्रीय विकेट आहेत. ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारी साक्षी मलिक आणि माजी विश्वविजेत्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनाही समितीने या खेळाडूंच्या यादीत स्थान दिले आहे. परंतु, अंतिम निर्णय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांच्यावर सोपवण्यात आला आहे. कारण, या दोन्ही महिला खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला आहे.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर साक्षीला खेलरत्न पुरस्कार देण्यात आला, तर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मीराबाईं यांनी २०१८ मधील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसह हा पुरस्कार जिंकला.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version