नवी दिल्ली, दि. १० मे २०२०: केंद्रीय गृहमंत्रालयाने सीबीएसई- म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या देशभरातील ३,००० शाळा मूल्यमापन केंद्र म्हणून सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. सीबीएसई द्वारे घेतल्या गेलेल्या दहावी आणि बारावी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या वेळेत मूल्यमापन होऊन निकाल लावता यावा, या दृष्टीने ही परावानगी देण्यात आली आहे.
मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ही मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्रालयाचे आभार मानले आहेत. देशभरातील ३,००० सीबीएसई संलग्न शाळा केवळ पेपर तपासणीच्या मर्यादित कामांसाठी सुरु केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे १.५ कोटी उत्तरपत्रिकांचे लवकरात लवकर मूल्यमापन करणे शक्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. मात्र, बोर्डाचे उर्वरित पेपर्स झाल्यावरच या दोन्ही परीक्षांचे निकाल लावले जातील. (हे पेपर्स एक जुलै ते १५ जुलै दरम्यान नियोजित आहेत.)
न्यूज अनकट प्रतिनिधी