राज्यात ४ हजार ४५६ नवीन रुग्णांची नोंद; १८६ जणांचा मृत्यू

6
मुंबई, २ सप्टेंबर २०२१: राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. अद्यापही दररोज नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच तज्ञांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करत आहे. दरम्यान काल राज्यात  ४,४५६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४ हजार ४३०  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६२ लाख ७७ हजार २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०३ टक्के आहे.
काल १८६ करोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात २ लाख ९० हजार ४२७ व्यक्ती होमक्कारंटाईनमध्ये आहेत तर २ हजार ०७१ व्यक्ती संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ५१ हजार ०७८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख ६९ हजार ३३२ झाली आहे.
कोविडच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन अनेकविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोविड राज्य कृती दलाने रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार, असून त्यांच्या संबोधनाने परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख उपस्थित राहणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा