एआयसी पिकविमा कंपनीकडून ५० हजार ७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा, शेतकऱ्यांकडून रविकांत तुपकरांचे जंगी स्वागत

बुलढाणा १६ जून २०२३: शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता, आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी लढा देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल, तुपकर यांच्यावर शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी फुलांचा वर्षाव केला. शेतकऱ्यांकडून फटाके फोडून तुपकर यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. सोयाबीन-कापसाला दरवाढ, पिक विमा, सततचा पाऊस, पीक कर्ज आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई यासह शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रविकांत तुपकर सातत्याने लढा देत आहेत. रविकांत तुपकर यांनी आत्मदहन आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे.

विदर्भातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुपकर यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले होते. १५ जून पर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, १६ जून रोजी हजारो शेतकऱ्यांसह मुंबईत धडक देऊन, एआयसी विमा कंपनीच्या २० व्या मजल्यावरील कार्यालयातून खाली उड्या मारु, असा गंभीर इशारा देत त्या आंदोलनाची तयारीही सुरु केली होती. दरम्यान या आंदोलनाच्या धसक्याने, एआयसी पिकविमा कंपनीने जिल्ह्यातील ५०,७५७ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून शेतकऱ्यांनी तुपकर यांच्याकडे भेटण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी करत, तुपकरांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर यांच्यावर शेतकऱ्यांनी पुष्पवृष्टी करुन त्यांचा शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय झालाय, तेथे जाऊन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. अनेकदा त्यांनी आंदोलने केली आहेत. त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांसोबत केलेल्या आंदोलनाला यश देखील मिळाले आहे. महाराष्ट्रात रब्बी आणि खरीप हंगामात शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालेले, त्यासाठी देखील तुपकरांनी आंदोलन केले. सध्या ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविम्याची रक्कम जमा झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा