पाचवी, आठवीची बोर्ड परीक्षाच; उच्च न्यायालयाचा निकाल

बेंगळुरू, १६ मार्च २०२३ : उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने राज्य सरकारला इयत्ता पाचवी आणि आठवीच्या केंद्रस्तरीय (बोर्ड) परीक्षा घेण्यास बुधवारी हिरवा कंदील दर्शविला. दहा दिवसांनंतर म्हणजे २७ मार्चपासून परीक्षा घेण्यास यावी. परीक्षेत अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रश्न विचारू नये, असा आदेशही उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुलांचा बौद्धिक स्तर काय आहे, तो सुधारण्याचे उपाय करण्यासाठी यंदापासून पाचवी ते आठवीची बोर्ड परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला होता. मात्र, त्याला पालकांनी विरोध करीत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या एकसदस्यीय खंडपीठाने बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात दिला होता. त्याविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या विभागीय पीठाकडे अपील केले होते.

अपिलावर गेले दोन दिवस सुनावणी झाली. बुधवारी न्यायालयाने परीक्षा घेण्यास हिरवा कंदील दाखवत एकसदस्यीय खंडपीठाचा निकाल फिरवला. सध्या शाळांमध्ये पहिली ते नववीच्या परीक्षा सुरू असून, त्या संपल्यानंतर २७ मार्चपासून पाचवी आणि आठवीची बोर्ड परीक्षा घेण्यात यावी, असे सुचविण्यात आले. त्यामुळे पाचवी आणि आठवीची यंदा बोर्ड परीक्षा होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा