नवी दिल्ली, २२ जुलै २०२१: लडाखनंतर आता चीन उत्तराखंड सीमेवरही सक्रिय असल्याचं दिसते. ६ महिन्यांहून अधिक काळानंतर चिनी सैन्याने पुन्हा एकदा उत्तराखंडच्या बाराहोटी सेक्टरमध्ये आपली हलचाल वाढविलीय. सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की उत्तराखंडमधील बाराहोती भागात चीनची क्रियाशीलता वाढली आहे, ज्याला एलएसीचे मध्यवर्ती क्षेत्र देखील म्हटलं जातं. असं मानलं जातं की भविष्यात चीन येथे आपली हालचाल वाढवू शकेल, त्यास सामोरे जाण्यासाठी भारताकडूनही तयारी सुरू आहे.
सूत्रांनी सांगितले की, चिनी सैन्याचे सुमारे ४० सैनिक एलएसीवर गस्त घालण्यासाठी बाराहोतीजवळ आले होते. बर्याच दिवसानंतर या भागात चीनची गतिविधी दिसून येत आहे.
भारतीय सैन्यही सतर्कतेवर …
सुत्रांनी सांगितलं की, चिनी सैन्याने आपल्या एलएसीवरील एअरबेसवर गतिविधी वाढविली आहे, जिथे अनेक ड्रोन आणि हेलिकॉप्टर कार्यरत आहेत. बाराहोतीमध्ये यापूर्वी चीनने बर्याच वेळा हस्तक्षेप केलाय आणि तो या भागाबरोबरच ईशान्येकडील बर्याच भागात दावा करतो. गेल्या वर्षी लडाखमधील संघर्षासारख्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्यदेखील येथेच तैनात असल्याचे सूत्रांकडून कळालं. सैन्य पुढं सरकत आहे आणि कमांडर सुद्धा येथे तळ ठोकून आहेत.
अलीकडेच, चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत आणि सेंट्रल आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाई डिमरी यांनी चीनच्या सीमेवरील मध्यवर्ती क्षेत्रासह उत्तराखंडमधील अनेक भागातील सुरक्षेचा आढावा घेतला.
गेल्या वर्षीपासून भारत आणि चीनमधील तणाव वाढला आहे आणि तरीही दोन्ही देशांचे ५० हजाराहून अधिक सैनिक लडाख सीमेवर तैनात आहेत. एलएसीचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असून राजकीय आणि मुत्सद्दी पातळीवरही या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे