लंडन, ९ सप्टेंबर २०२३ : महासागरांच्या तापमानात उच्चांकी वाढ झाल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यांचाच हा परिणाम आहे. महासागरांचे तापमान वाढणे हे केवळ सागरी पर्यावरणासाठी नव्हे तर पृथ्वीसाठीही चिंतेचे कारण ठरु शकते. जगातील समुद्राच्या पृष्ठभागाच्या सरासरी दैनंदिन तापमानाने, गेल्या आठवड्यात तापमानाचा २०१६ मधील विक्रम मोडला आहे.
युरोपियन संघाची क्लायमेट चेंज सव्हिस असलेल्या ‘कोपरनिकस’ या संस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान २०.९६ सेल्सिअस म्हणजेच ६९.७३ अंश फॅरेनहाईटपर्यंत गेले आहे. ते वर्षातील या काळातील सरासरीपेक्षा कितीतरी अधिक आहे. हवामानाच्या नियंत्रकांमध्ये महासागरांचाही समावेश होतो. ते उष्णता शोषून घेत असतात. तसेच निम्म्या पृथ्वीच्या ऑंक्सिजनची निर्मिती करतात आणि ऋतुचक्राला चालना देतात.
महत्त्वाचे म्हणजे महासागरांकडून हवेतील कार्बन डायॉक्साईड शोषून घेतला जात असतो. मात्र समुद्राच्या उष्ण पाण्याची असा डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जगाचे तापमान वाढवणारा हा वायू अधिक प्रमाणात वातावरणात राहू शकतो. त्यामुळे अन्नसाखळीवरही परिणाम होऊ शकतो. मासळीच्या साठ्यावरही यांचा विपरीत परिणाम होईल असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर










































