केळोशी, तारळे दि. ३० एप्रिल २०२०: देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले आहे. ग्रामिण भागात दैनंदिन जीवनात फारसा बदल झाला नसला तरी रोज कमवून घर खर्च चालवण्यासाठी धडपडणाऱ्या मजूरांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. राधानगरी तालुक्यातील केळोशी बुद्रूकच्या लोंढा लघू पाठबंधारे प्रकल्पाचे काम करणाऱ्या मजूरांवर अशीच उपासमारीची वेळ आली आहे.
या अगोदर केळोशी ग्रामपंचायत आणि धामोड येथील भानोबा व्यापारी संघटनेने धान्य स्वरूपात मदत केली होती. आत्ता पर्यंत ते कसेबसे पूरवीले पण हाताला काम नसल्याने तेही पुरेनासे झाले आहे गेली दोन दिवस त्यांच्या घरी अन्नाचा कणही नव्हता. याची माहिती मिळताच “राधानगरी तालूका हेल्पींग हँड फौंडेशनतर्फे” राधानगरी तालुकाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक कांबळे यांच्या पुढाकाराने त्या नऊ कुटूंबाना आठ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी लक्ष्मण कांबळे यांनी, या कुटुंबातील मजूरांची संख्या जास्त असल्याने ही मदत पुरेशी नाही. यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सामाजिक संस्थांनी धान्याच्या स्वरूपात मदत करावी असे “न्यूज अनकट”शी बोलताना आवाहन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी दिपक बागडी, संदीप मगर, युवराज कौलवकर, कल्पना भोसले, युवराज कांबळे, विमल पाटील, शिवाजी पाटील आणि फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे












































