‘भारत जोडो’नंतर आता कॉंग्रेसचे देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२२ : कॉंग्रेस पक्षाकडून देशभरात काढण्यात आलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेकडून मिळत आहे. यानंतर आता काँग्रेसकडून पुढील पक्ष वाढीची घोषणा करण्यात आली असून, या अंतर्गत ‘भारत जोडो यात्रे’नंतर आता २६ जानेवारीपासून देशभरात ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू करणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, ‘भारत जोडो यात्रा’ संपल्यानंतर २६ जानेवारीपासून पुढील दोन महिने देशभरात ‘हाथ से हाथ जोडो’ अभियान सुरू केले जाईल. या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर लोकांशी संपर्क साधला जाईल. तसेच या अभियानामार्फत राहुल गांधी यांचे पत्र देखील लोकांच्या हाती दिले जाणार आहे, ज्यामध्ये या अभियानाचा संदेश असेल आणि त्यासोबत मोदी सरकारच्या विरोधात एक आरोपपत्रही जोडले जाईल.

  • प्रियांका गांधींवर मोठी जबाबदारी

‘हाथ से हाथ जोडो अभियान’ अंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम होणार आहे. ब्लॉक आणि बूथ स्तरावर यात्रा काढण्यात येणार आहेत.तर जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर रॅली काढण्यात येणार आहेत. तसेच प्रियांका गांधी यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. प्रियांका गांधी या आता प्रत्येक राज्यात महिला मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. तसेच प्रियांका गांधींसह कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाचे इतर वरिष्ठ नेते ‘हथ से हाथ जोडो अभियान’शी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा