गेहलोत पाठोपाठ दिग्विजय सिंह यांची देखील अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार

नवी दिल्ली, ३० सप्टेंबर २०२२ : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. तत्पूर्वी दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकांर्जू खर्गे यांच्यामध्ये या पदासाठी थेट लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

निवडणूक लढवण्याऐवजी आपण मल्लिकार्जुन खर्गे यांचे समर्थन करणार असल्याचे दिग्विजय यांनी स्पष्ट केले आहे. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आहे आणि करत राहीन त्यामुळे खर्गे यांच्या विरोधात लढण्याचा विचारही करू शकत नसल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.

शशी थरुर यांनी काल प्रतिस्पर्धी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांनी एकमेकांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या भेटीचा फोटो थरुर यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यामध्ये दोन्ही नेते एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. ही शत्रूंमधील लढाई नाही, तर सहकाऱ्यांमधील मित्रत्वाची स्पर्धा आहे, असे कॅप्शन थरुर यांनी या फोटोला दिले आहे. काँग्रेसचा विजय हेच दोघांचे लक्ष्य असल्याचे थरुर म्हणाले आहेत.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा ३० सप्टेंबर शेवटचा दिवस आहे. तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. या पदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यास १७ ऑक्टोबरला मतदान होणार असून, १९ ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.
अशी माहिती काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष, एम मिस्त्री यांनी दिली आहे.

दरम्यान, G-२३ गटातून वेगळा उमेदवार उभा करण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. मनीष तिवारी यांनी यापूर्वीच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा