गोल पोस्ट कट्टा आध्यात्मिक राज्यातली धार्मिक स्थळं खुली करण्याच्या निर्णयानंतर देवस्थानांमधे गर्दी टाळण्यासाठी मंदिरं प्रशासनांकडून विविध...

राज्यातली धार्मिक स्थळं खुली करण्याच्या निर्णयानंतर देवस्थानांमधे गर्दी टाळण्यासाठी मंदिरं प्रशासनांकडून विविध उपाय योजनांची अंमलबजावणी

तुळजापूर , १६ नोव्हेंबर २०२० : राज्य सरकारनं आजपासून धार्मिक स्थळं उघडण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातल्या विविध मंदिर प्रशासनांनी गर्दी टाळण्यासाठी विविध उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनानं राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार नियमावली लागू केली आहे. त्यानुसार देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य असून नोंदणी करणाऱ्या भक्तांची संख्या एका दिवसात दहा हजाराच्यावर गेली आहे.

सध्या दररोज केवळ चार हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था केली असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. यात एक हजार सशुल्क दर्शन, तर तीन हजार मोफत दर्शन परवान्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

पहाटे ५ वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत १६ तास हे मंदिर भाविकांसाठी खुलं राहणार आहे. शिर्डी इथल्या साईमंदिरातही दररोज ६ हजार भक्तांना ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केल्यानंतरच श्री साईबाबांचं दर्शन करता येणार आहे. कोविड संदर्भातले आरोग्य नियम पाळून भक्तांनी सहकार्य करावं असं आवाहन मंदिर प्रशासनानं केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version