कोपरगाव नगरमध्ये भुमीपूजन फलकावरून अजित पवार गट आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने

कोपरगाव, १६ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार आपल्या समर्थक ४० आमदारांसह शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट अशा दोन गटात राष्ट्रवादीची विभागणी झाली. शरद पवार यांचा गट मविआत राहिला. तर अजित पवार गट हा सत्तेत सहभागी होत युतीचा भाग झाला. त्यामुळे आता राज्याच्या सत्तेत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्र आले आहेत.

वरिष्ठ पातळीवर नेत्यांची मने सत्तेच्या समिकरणांनी जुळली असली तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये अजूनही मनोमिलन झालेले दिसत नाही, याचा प्रत्यय अनेक ठिकाणी पाहायला मिळत असतो. यातूनच मग वरिष्ठ पातळीवर युती असतानाही कार्यकर्त्यांमध्ये राडा होतो. असाच राडा भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावामध्ये पाहायला मिळाला आहे. कोपरगाव शहरात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून भुमीपूजन फलकावरून वाद पेटला आहे.

कोपरगाव मध्ये रस्त्याच्या कामाच्या भुमिपूजन फलकावरून वाद झाल्याने भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजप नेते विवेक कोल्हे यांच्या समोरच कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. तर जोरदार राडा देखील झाला. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि भापजच्या बोर्डसमोरच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बोर्ड लावला. यानंतर हा वाद-विवाद दोन तास धुमसत राहिल्याने अखेर पोलीसांनाच यात हस्तक्षेप करावा लागला. यानंतर हा वाद थांबला. तर येथील दोन्ही फलक देखील पोलीसांनी हटवले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा