खाते वाटपाचा तिढा थेट दिल्ली दरबारी, अमित शाह मध्यस्थी करणार,अजित पवार, प्रफुल पटेल दिल्लीला जाण्याची शक्यता

मुंबई, १२ जुलै २०२३ : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट महायुतीत सामील झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, दहा दिवस उलटून गेले तरी खाते वाटपाचा तिढा सुटलेलाच नाही. गेल्या तीन दिवसांपासून महायुतीत खाते वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न होत आहे. पण तिढा काही सुटता सुटत नाही. त्यामुळे आता थेट हा प्रश्न दिल्ली दरबारी जाण्याची शक्यता आहे. थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या विषयात मध्यस्थी करणार असल्याचे समजते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. जोपर्यंत खाते वाटप होत नाही तोपर्यंत विस्तार करता येणार नाही. खाते वाटपावरच मंत्र्यांची संख्या ठरणार आहे. खाते वाटपानंतर किती मंत्र्यांना शपथ द्यायची आणि त्यांना कोणती खाती द्यायची हे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तारही रखडला आहे. खाते वाटपाचा तिडा सुटत नसल्याने हा प्रश्न दिल्ली दरबारी जाणार आहे.

युतीत सध्या भाजपकडे अर्थखाते आहे. मात्र, अर्थ खाते अजित पवार यांना देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे. गृह खाते हे फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे. तर महसूल खाते काढून राधाकृष्ण विखे पाटील यांची नाराजी ओढवून घेता येणार नाही. तर, अर्थ खाते राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गटाने विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भाजपसमोर यक्ष प्रश्न उभा राहिले आहे. या शिवाय आणखी दोन ते तीन खात्यांवरून महायुतीत बेबनाव आहे. प्रमुख खाती न सोडण्याचा शिंदे गटाने निर्धार केला आहे. तर राष्ट्रवादीलाही महत्त्वाची खाती हवी आहेत.

दरम्यान, गेली तीन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठका सुरू आहेत. वर्षा बंगल्यावर मध्यरात्रीपर्यंत या तिन्ही नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. त्यावर खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर चर्चा होत आहे. काही खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची सहमती झाली आहे. पण दोन ते तीन खात्यांबाबत या तिन्ही पक्षांची अजून सहमती होताना दिसत नाही. शिंदे गटात अनेक आमदार मंत्रिपदाकडे नजारा लावून बसले आहेत. त्यामुळे आपल्या वाट्याचे एकही मंत्रिपद राष्ट्रवादीला देण्यास शिंदे गट तयार नाही. त्यामुळे हा तिढा वाढल्याचे सांगितले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा