नागपूर, ६ ऑक्टोंबर २०२२ : भारत मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेनं आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी मुख्यालयाबाहेरून १०० जणांना ताब्यात घेतलं आहे.
संघाची विचारधारा ही भारतीय संविधानाला धरून नाही, असे म्हणत वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाने आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या RSS मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले होते.
दरम्यान नागपूरमध्ये संघ मुख्यालयावर मोर्चा काढल्या प्रकरणामुळे तणावपूर्ण वातावरण झाले आहे. मोर्चाला परवानगी नसतानाही भारत मुक्ती मोर्चा आंदोलनावर ठाम होते. तर RSS कार्यालयाबाहेरही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील भारत मुक्ती मोर्चानं आज नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि संघटनेची विचारधारा भारतीय संविधानानुसार नाही, अशी टीका केली. दरम्यान,
पोलिसांनी अखेरीस वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा आणि दीक्षाभूमी येथील धर्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा या पार्श्वभूमीवर पोलिसांवर ताण असल्याने ६ ऑक्टोबरला होणाऱ्या बेझनबाग ते संघ मुख्यालयावर निघणाऱ्या मोर्चाला पोलीस आणि न्यायालय यांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नसल्या मुळे पोलिसांनी कार्यकर्ते रोखले होते, तर कार्यकर्त्यांनी इंदौरी चौकामध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार्यकर्त्यांची धरपकड केली. यावेळी आंदोलकांनी RSS विरोधात घोषणाबाजी केली.
कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी इंदोरा आणि बेझनबाग येथे १४४ कलम अंतर्गत जमावबंदी लावण्यात आल्ली आहे. ४ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नये आणि प्रक्षोभक आवाहनाला जनतेने प्रतिसाद देऊ नये असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. तसंच काही कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं आणि शहरात वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे












































