चीनला आणखी एक धक्का, बीएसएनएल-एमटीएनएलने ४ जी टेंडर केले रद्द

नवी दिल्ली, दि. १ जुलै २०२०: भारताने चीनला आणखी एक धक्का दिला आहे. बीएसएनएल आणि एमटीएनएलने त्यांचे ४ जी टेंडर रद्द केले आहेत. आता पुन्हा नवीन टेंडर देण्यात येईल. सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलला चीनी कंपन्यांकडून वस्तू न खरेदी करण्याचे निर्देश दिले होते, त्यानंतर निविदा रद्द करण्यात आली आहे.

आता नव्या निविदेत मेक इन इंडिया आणि भारतीय तंत्रज्ञानास प्रोत्साहित करण्यासाठी नवीन तरतुदी असतील. विशेष म्हणजे, बीएसएनएल आणि एमटीएनएलवर सर्वाधिक चिनी उत्पादने खरेदी केल्याचा आरोप होता. यानंतर सरकारने सरकारी कंपन्यांनी चिनी कंपन्यांकडून वस्तू खरेदी करणे टाळावे, असे निर्देश दिले होते.

दूरसंचार मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशात असे म्हटले होते की कोणत्याही चिनी कंपन्यांनी बनवलेल्या उपकरणांचा ४ जी सुविधेच्या अपग्रेडमध्ये वापर करू नये. संपूर्ण निविदा नव्याने देण्यात याव्यात. सर्व खाजगी सेवा संचालकांना चिनी उपकरणांवर अवलंबून असलेल्या सुविधा कमी करण्याच्या सूचना देण्यात येतील.

यापूर्वी एमटीएनएल आणि बीएसएनएलने ४ जी नेटवर्कसाठी चिनी घटक न वापरण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय चीनला धक्का देण्यासाठी रेल्वेने ४७१ कोटींचा सिग्नलिंग प्रकल्प रद्द केला होता. याव्यतिरिक्त, एमएमआरडीएने मोनोरेलशी संबंधित २ चिनी कंपन्यांची निविदा रद्द केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा