केंद्र सरकारने आणलेल्या अध्यादेशा विरोधात, अरविंद केजरीवाल यांना देशभरातील विरोधी पक्षांचा वाढता पाठिंबा

नवी दिल्ली, २ जून २०२३ : केंद्र सरकारने दिल्ली सरकार विरोधात आणलेल्या अध्यादेशाच्या विरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्याला आता मोठा पाठिंबाही मिळत आहे. अरविंद केजरीवाल यांच्याकडून या विधेयकला राज्यसभेत विरोध करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. केजरीवाल यांना आतापर्यंत, जेडीयू,आरजेडी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बीआरसी आणि माकप त्याचबरोबर द्रविड मुन्नेत्र कळघमने अध्यादेशाला विरोध करत पाठिंबा दर्शवला आहे.

केजरीवाल यांनी केंद्र सरकार विरोधात घेतलेल्या भूमिकेला सध्या जोरदार धार आली आहे.अरविंद केजरीवाल सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमकेचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईत आहेत. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांना आश्वासन दिले आहे त्यांचा पक्ष राज्यसभेत अध्यादेशाच्या विरोधात मतदान करणार आहे. त्याचबरोबर स्टॅलिन यांनी केंद्रावर बिगर भाजप शाशीत राज्यात जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

केंद्र सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राज्य सरकारलाही स्वतंत्रपणे काम करण्यापासून थांबवत असल्याचा ठपका स्टॅलिन यांनी ठेवला आहे. त्यामुळे ज्या ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही अध्यादेशाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन स्टॅलिन यांनी केले आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधी पक्षांमध्येही अशी निष्पक्षपणे चर्चा होत राहिली पाहिजे असे मतही स्टॅलिन यांनी यावेळी व्यक्त केले.

तर दुसरीकडे केजरीवाल यांनी ही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीतील जनता आठ वर्षापासून न्यायासाठी लढत राहिली आहे मात्र भाजपने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अध्यादेश आणून अवघ्या आठ दिवसांत बदलला असल्याचा केंद्र सरकारवर आरोप केला आहे. केंद्राचा अध्यादेश लोकशाही विरोधी आणि असंविधानिक असल्याचे म्हणत भाजप लोकशाही विरोधी काम करत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा