राज्यातील रखडलेल्या ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आणि इतर विभागाकडील १९,४६० पदांची भर्ती होणार

मुंबई, ५ ऑगस्ट २०२३ : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत सर्व जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सरळसेवेची आरोग्य विभागाकडील १००% आणि इतर विभागाकडील ८०% रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० एवढी पदे सरळसेवेने भरण्याबाबत हा निर्णय आहे. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु, त्या दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोनाची पार्श्वभूमी तसेच इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नव्हती.

त्यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही रखडलेली मेगा भरती करण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट २०२३ रोजी यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक तसेच पात्र उमेदवारानी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

जाहिरातींच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी, शर्ती इत्यादी बाबी संबंधित जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे असे मंत्री महाजन यांनी सांगितले.राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार आहे. यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अर्ज करावे. अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये असे आवाहनही मंत्री महाजन यांनी केले आहे.

भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेद्वारे तयार होणार असल्यामुळे उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास आणि परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्याला जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस (IBPS) कंपनीमार्फत करण्यात येत असून परीक्षेमध्ये अत्यंत पारदर्शकता राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असेही ते म्हणाले.

ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ मधील जिल्हा परिषद जाहिरातीकरीता अर्ज केला होता मात्र आता वय वाढल्याने ते परीक्षेस बसण्यास अपात्र होत आहेत अशा उमेदवारांना ३१ डिसेंबर, २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे. ज्या उमेदवारांनी मार्च २०१९ परीक्षेकरीता अर्ज केलेला नाही, त्यांनाही सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयास अनुसरुन कमाल वयोमर्यादेत दोन वर्ष एवढी शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीबाबत प्रसिध्द होणाऱ्या सर्व जाहिरातींकरीता पात्र करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा