मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अडकले तब्बल २० साप

औरंगाबाद, २९ डिसेंबर २०२२ : मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात अनेकदा नदी किंवा तलावातील कचरा अडकल्याचे ऐकिवात किंवा पाहिले असेल; पण एका मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क वीस साप अडकले. एक-दोन नव्हे, तर तब्बल वीस साप पाहून मच्छीमाराची भंबेरी उडाली. यावेळी सर्पमित्रांच्या मदतीने सापांची सुटका करण्यात आली.

याविषयी माहिती अशी, की मंगळवारी (ता. २७) विटावा शिवारातील तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात एक-दोन नव्हे, तर वीस साप अडकले. साप पाहून मासेमारी करणाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांना बोलवावे लागले. २० पैकी १४ सापांचा जीव वाचविण्यात त्यांना यश आले, तर सहा सापांचा मृत्यू झाला.

जिवंत सापांना सुखरूप निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. विटावा गावात नदीमध्ये मासेमारी करणाऱ्या लोकांनी जाळे टाकले होते. त्यात जाळ्यामध्ये साप अडकले. बालाजी बोईनवाड या स्थानिक नागरिकाने केलेल्या दूरध्वनीवरून मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी मंगळवारी (ता. २७) सर्पमित्र मनोज गायकवाड, लक्ष्मण गायके यांना घटनास्थळी पाठवून सापांची सुटका केली.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा