आषाढी पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज: प्रांताधिकारी डॉ. यशवंत मानेंचे निर्देश

53
A photograph captures a community meeting in a rectangular room with several people seated on plastic chairs around tables. The attendees include government officials, police officers, and local leaders, all engaged in discussion. A banner related to the Ashadhi Wari pilgrimage is displayed on the wall behind them, indicating preparations for the event.
आषाढी पालखी सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज:

Ashadhi Palkhi Sohala Dehu 2025: जगद्‌गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा ३४० वा आषाढी पायी वारी पालखी सोहळा येत्या १८ जून रोजी श्री क्षेत्र देहूगावहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून, या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला आहे. प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी देहू येथील आढावा बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था आणि विविध शासकीय विभागांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

मुख्य मंदिराच्या दर्शनबारी येथील सभागृहात शुक्रवारी (दि. ३०) झालेल्या या बैठकीत अप्पर तहसीलदार जयराज देशमुख, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असलेल्या विविध पैलूंवर या बैठकीत सखोल चर्चा झाली.

संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली. विशेषतः देहू ते देहूरोड आणि देहू ते देहूफाटा (येलवाडी) दरम्यानच्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर भर देण्यास सांगण्यात आले. तसेच, अलगदशहावली दर्ग्याजवळील कापूर ओढा पुलावरील तुटलेले कठडे दुरुस्त करण्याची मागणीही करण्यात आली. वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्याचा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

यावर महावितरणचे संतोष झोडगे यांनी, विद्युत पुरवठा खंडित झाल्यास त्वरित दुसऱ्या फीडरवरून पुरवठा सुरळीत केला जाईल आणि यात्रा काळात विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन दिले.

नगरपंचायत प्रशासनाला पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य उपाययोजना, स्वच्छता व कचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश देण्यात आले. पालखी रथाचा आणि वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवणे, आपत्ती पूर्वनियोजनाचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्थापन, मुक्काम स्थळी विद्युत व पिण्याच्या पाण्याची सोय तसेच पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. मावळ तालुक्यातील दिंडी प्रमुखांनीही आपापल्या दिंड्यांचे नियोजन सुरू केले असून, रविवारपासून बैठका घेऊन साहित्यांची खरेदी करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे