बाबरी मशीद-धार्मिक एकतेचा संदेश देणारा दुवा

एक शतकापासून सुरु असलेल्या राम मंदिर व बाबरी मशीद खटल्याचा निकाल जाहीर झाल्यांनतर प्रत्येक भारतीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. आजपर्यंत राम मंदिर बनविण्याच्या मुद्द्यावर अनेक निवडणुका लढविल्या गेल्या. कुणी जिंकले, कुणी पराभूत झाले. पण आता निकाल लागल्यामुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
आता अयोध्येमध्ये राम मंदिर व मशीद एकाच ठिकाणी उभा राहणार असल्याने काही काळातच हे ठिकाण धार्मिक एकतेचे प्रतीक म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे शांतता आणि बंधुतेचा संदेश दिला असून हिंदू-मुस्लिमांमधल्या मतभेदांचा अंत होईल आणि आपला देश एकत्र येईल, असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
बाबरी मशीद हा भारतीय राजकीय, सामाजिक, धार्मिक व्यवस्थेला हादरवणारे एक भीषण प्रकरण होते. ते आता विसरुयात व खराखुरा प्रागतिक भारत घडवूयात!

नेमका वाद काय होता?
१५२८ साली मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते.१८५३ मध्ये इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली.
१५ मार्च १८५८ रोजी मंदिर-मशीद वादामुळे लॉर्ड कॅनिंगने ती जागा जप्त केली. मात्र हिंदू-मुस्लिमांचे पूजा व नमाजाचे अधिकार कायम ठेवले. बदल एकच केलेला की दोन समुहांत संघर्ष पेटू नये म्हणून बाहेरचे आवार व आतले आवार यांमध्ये एक भिंत उभी केली.
त्याचाच अर्थ हिंदुंचा तेथील पूजेचा अधिकार ब्रिटिशांनीही अमान्य केला नाही. हिंदुंची पूजा बाह्य आवारात सातत्याने सुरू राहिली असली तरी मशिदीत मात्र सातत्याने नमाज केली जात होते असे दिसत नाही.
१९४९ च्या संघर्षामध्ये हिंदुंनी मशिदीच्या मुख्य घुमटाखाली राममूर्ती स्थापित केल्यापासून तेथे नमाज करणे पूर्णपणे बंद करून टाकले. त्यानंतरही न्यायालयात १९६१ पासून वाद दाखल झाला. असला तरी ताबा हक्क मात्र हिंदूकडेच राहिला.