उत्तर प्रदेशच्या बहराईच जिल्ह्यातील निंदुनपुरवा टेपरहा गावात भीषण घटना घडली आहे. शेती व पशुपालन करणाऱ्या विजय कुमार यांनी बुधवारी सकाळी दोन अल्पवयीन मुलांची हत्या करून स्वत:च्या घराला आग लावली. या भीषण अग्निकांडात त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून चार जनावरंही जळून खाक झाली आहेत. घटनेनंतर संपूर्ण गावात दहशत व शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय कुमार यांनी सूरज यादव (१४) आणि सनी वर्मा (१३) या दोन मुलांना शेतात लसणाच्या लागवडीसाठी बोलावले होते. मात्र, नवरात्रीच्या कामामुळे त्यांनी शेतात जाण्यास नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या विजय कुमार यांनी धारदार हत्याराने दोघांची हत्या केली. त्यानंतर ते घरात गेले व दार लावून पत्नी आणि दोन मुलींसह खोलीत आग लावली. काही मिनिटांत आग संपूर्ण घरात पसरली आणि कुटुंब आक्रोश करत असतानाच जळून खाक झाले.
ग्रामस्थांनी तत्काळ पोलीस व अग्निशमन दलाला कळवले. पथकाने आग विझवून मृतदेह बाहेर काढले. शेजारील गोठ्यातील चार जनावरंही आगीत दगावली. पोलिसांनी सहाही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. विजय कुमार गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ध्रुव पाटील













































