देशात १ जुलै २०२२ पासून एकेरी वापरातील प्लास्टिक वस्तूंवर बंदी!

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट २०२१: एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकला २०२२ पर्यंत टप्याटप्याने हद्दपार करण्यासाठी पंतप्रधानांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने, एकल वापराच्या, निश्चित केलेल्या प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंध करणारे प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम २०२१ अधिसूचित केले आहेत. २०२२ पर्यंत,कमी उपयोगाच्या आणि मोठ्या प्रमाणात कचरा करणाऱ्या एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंना प्रतिबंधित करणारा हा नियम आहे.

एकल वापराच्या प्लास्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी कृती करण्याकरिता भारत कटीबद्ध आहे. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या चौथ्या पर्यावरण सभेत एकल वापराच्या प्लास्टिक उत्पादनामुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात ठराव मांडला होता.या अतिशय महत्वाच्या विषयाची जागतिक समुदायाने तातडीने दखल घ्यावी असा याचा उद्देश होता. या ठरावाचा या सभेत स्वीकार हे महत्वाचे पाऊल होते.

१ जुलै २०२२ पासून पॉलीस्टीरीन आणि विस्तारित पॉलीस्टीरीन सह एकल-उपयोगाच्या खालील प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक , वितरण, विक्री आणि उपयोग प्रतिबंधित करण्यात येईल-

प्लास्टिक काडी असलेल्या ईअरबड्स,फुगे, झेंडे, कॅन्डी आणि आईसक्रिमना असलेल्या प्लास्टिक काड्या, सजावटीसाठीचे पॉलीस्टीरीन [थर्माकोल];

प्लेट, कप, पेले, काटे-चमचे, सुरी, स्ट्रॉ, मिठाईच्या खोक्याभोवती, निमंत्रण पत्रीकेभोवती, सिगारेट पाकीटाभोवती गुंडाळण्यात येणारी फिल्म, १०० माइक्रोन पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, स्टरर.

हलक्या वजनाच्या प्लास्टिक थैल्यामुळे निर्माण होणारा कचरा थांबवण्यासाठी ३० सप्टेंबर २०२१ पासून प्लास्टिक थैल्यांची जाडी ५० मायक्रोन वरून वाढवून ७५ मायक्रोन तर ३१ डिसेंबर २०२२ पासून १२० मायक्रोन करण्यात आली आहे. जाडी वाढवल्याने या थैलीचा दुसऱ्यांदा उपयोग शक्य होणार आहे.

विस्तारित निर्माता उत्तरदायीत्वाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या संदर्भातल्या मार्गदर्शक तत्वांना प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारित नियम २०२१ द्वारे कायद्याचे पाठबळ देण्यात आले आहे.एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी जनजागृती आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकार उपाययोजना करत आहे.

एकल वापराच्या प्लास्टिकला कल्पक पर्याय तसेच प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी डिजिटल तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता इंडिया प्लास्टिक चलेंज- हॅकेथॉन २०२१ आयोजित करण्यात आले असून स्टार्ट अप इंडिया उपक्रमा अंतर्गत स्टार्ट अप्स आणि उच्च शिक्षण संस्थामधल्या विद्यार्थ्यांसाठी याचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा