कोकणात रत्नागिरीमध्ये समुद्र किनाऱ्याला बिपरजॉयचा फटका, पर्यटक जखमी

रत्नागिरी, १२ जून २०२३ : मागील दोन दिवसांपुर्वीच हवामान विभागाकडून ‘बिपरजॉय‘ चक्रीवादळावरून कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार बिपरजॉय चक्रीवादळ हे येत्या ३६ तासात आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे अरबी समुद्राच्या किनारपट्टीभागात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहे. याचकारणाने मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने (IMD) दिला.

आता बिपरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरीतील गणपतीपुळे इथे समुद्राला उधाण आले आहे. समुद्रात उंचच उंच लाटा तयार होत आहेत.या समुद्राला आलेल्या उधाणामुळे पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनारी असलेल्या दुकानांचेही या उधाणामुळे नुकसान झाले आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला मोठी भरती येण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आली होती.

हवामान खात्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागामध्ये यावेळी मोठ्या लाटा उसळतील तर मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्ग या किनारपट्टीवरती वादळी वाऱ्यासह लाटा उसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याचदरम्यान मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे. रत्नागिरी, पालघर, वसईसह ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा