मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार सत्तेत येणार हे निश्चित झाले आहे.मात्र आता भाजपने शिवसेनेला पहिली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली आहे. यासंदर्भात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘मातोश्री’ला प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती मिळत आहे. परंतु ती शिवसेनेने नाकारल्याची माहितीही आता समोर येत आहे.
शिवसेनेनं भाजपकडे अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाची मागणी केली होती. मात्र भाजपकडून याला नकार आल्याने शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला एकत्र घेत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचे सरकार येणार आता स्पष्ट झाल्याने भाजपने एक पाऊल मागे आल्याचे चित्र आता पहायला मिळते आहे
भाजपला वाटत होते की, काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे आणि काँग्रेस आमदारांचा दबाव लक्षात घेता काँग्रेस अध्यक्षांनी शिवसेनेसोबत सत्तास्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे.
आमच्याच नेतृत्वात सरकार येणार असं म्हणणाऱ्या भाजपने आता एक पाऊल मागे घेतले आहे. शिवसेनेला सुरुवातीची अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, महाविकासआघाडी सुसाट पुढे गेली असताना शिवसेना माघार घेणार नसल्याचे समजते आहे.