भारतीय लष्कराला मोठे यश; जम्मू – काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

नवी दिल्ली, २८ सप्टेंबर २०२२ : जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असल्याची माहिती समोर आली आहे.

कुलगाममधील अहवाटू या गावात भारतीय सुरक्षा दलांनी ही कारवाई केली. मोहम्मद शफी गनी (बटपोरा, कुलगाम) आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर (तकिया, कुलगाम) अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. अहवाटू या गावात काही दहशतवादी थांबल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार भारतीय सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोध मोहीम राबवली.

सुरक्षा दलांनी नाकेबंदी केल्यानंतर एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानुसार, सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि यात दोन्ही दहशतवादी मारले गेले.

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारामुळे परिसरातील गॅल गोडाऊनला आग लागल्याची घटनाही घडली. त्यामुळे या भागात अनेक स्फोट झाले आणि त्यामध्ये या चकमकीत एक जवान जखमी झाला. त्यानंतर जखमी जवानाला उपचारासाठी अवंतीपुरा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती सुरक्षा दलाने दिली. दहशतवाद्यांकडून दोन एके मालिकेतील रायफल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा