भाजपला 40 नवीन भोंगे भेटले, संजय राऊतांचा 40 बंडखोर आमदारांना खोचक टोला

नाशिक, 8 जुलै 2022: सध्या संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत. शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर शिवसेनेची पुन्हा बांधणी करण्यासाठी राऊत नाशिक मध्ये नगरसेवकांची भेट घेणार आहेत. उद्या मेळावा देखील आयोजित करण्यात आलाय. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांना असा प्रश्न विचारण्यात आला की बंडखोर आमदार तुमच्यावर असा आरोप करत आहेत की संजय राऊतांनी शिवसेना संपवली. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, भाजप सध्या शांत आहे, कारण या 40 आमदारांच्या माध्यमातून भाजप बोलत आहे. भाजपला 40 नवीन भोंगे भेटले असा खोचक टोला त्यांनी बंडखोर आमदारांना लावला.

ते म्हणाले की, भाजपने माझ्यावरील बोलणं थांबवलंय. त्यांना 40 नवीन भोंगे मिळाले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलतायत ते बोलूद्या. आम्ही शिवसेनेसाठी काय केलंय आणि काय करतोय हे महाराष्ट्र जाणतो. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे, आमचे सहकारी होते, आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो.

इथल्या अनेक लोकांना आम्ही आग्रहानं उद्धवजींना सांगून उमेदवाऱ्या द्यायला लावल्यात. हे सगळ्यांना माहित आहे. तेव्हा राऊतांनी नुकसान केलं म्हणजे काय? मी कालही म्हणालो, पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांचं कारण वेगळं होतं, की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी सांगितलं की आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नाहीत. तिसरं कारण त्यांचं होतं की राष्ट्रवादी आम्हाला निधी देत नाही. चौथ कारण त्यांनी अजून काहीतरी सांगितलं. आता ते पाचव्या कारणावरती आलेले आहेत की संजय राऊत कारणीभूत आहेत. त्यामुळं मी त्यांना सांगू इच्छितो की कारण काहीतरी निश्चित ठरवा, असं संजय राऊत म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा