नवी दिल्ली, ७ ऑक्टोंबर २०२०: हाथरस बलात्कार प्रकरणानंतर पूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. देशभरातून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. या दरम्यान भाजपच्या एका नेतानं वादग्रस्त विधान करत स्वतःवर टीकेचा भडिमार करून घेतला होता. बलियाचे आमदार सुरेंद्र सिंह म्हणाले की, ‘सगळ्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना चांगले संस्कार द्यायला हवेत. तेव्हाच बलात्कारासारख्या घटना थांबतील.’ त्यांच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केल्या. यातच आता आमदारांच्या या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनीही चांगलाच समाचार घेतलाय.
स्मृती इराणी सुरेंद्र सिंह यांचं नाव न घेता म्हणाल्या की, ‘हाथरस घटनेनंतर मला खूप अस्वस्थ वाटलं होतं. पण, एका नेत्यानं असं विधान केलं होतं की, मुलींवर चांगले संस्कार केल्यास बलात्काराच्या घटना कमी होतील. हाथरस प्रकरणावरुन काही लोक मुलींना उपदेश देत आहेत. परंतु, मी त्यांना सांगू इच्छिते की कुटुंबासाठी मुलगा आणि मुलगी हे एक असून दोन्ही मुलांवर चांगले संस्कार करणं ही पालकांची जबाबदारी आहे.’
पुढं त्या म्हणाल्या की, ‘या घटनेची बातमी मिळाल्यावर मला खूप अस्वस्थ वाटलं होतं. यानंतर मी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क देखील केला. याबाबत त्यांनी मला आश्वासन दिलं आहे. याप्रकरणी तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत केली. त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयला सोपवलं. लवकरच त्याचं सत्य समोर येईल.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे
