गोल पोस्ट इतर राजकारण महाराष्ट्रात भाजपाचे मिशन ४८ सुरू, रावसाहेब दानवे यांची माहिती

महाराष्ट्रात भाजपाचे मिशन ४८ सुरू, रावसाहेब दानवे यांची माहिती

पुणे, ०७ ऑगस्ट २०२२: भारतीय जनता पार्टी ज्यादिवशी निवडणूक जिंकते त्याच दिवसापासून पुढील निवडणुकीची तयारी सुरू करते.लोकसभेच्या निवडणुकीला आजून अवकाश आहे परंतु आम्ही महाराष्ट्रात लोकसभेसाठी मिशन ४८ सुरू केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या तयारीने आम्ही काम सुरू केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधत असताना त्यांनी भाजपाची निवडणूक रणनीती स्पष्ट केली. निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर जात आहेत, त्यामुळे भाजपने बारामतीवर लक्ष केंद्रित केलंय का यावर बोलताना ते म्हणाले प्रत्येक नेत्यांनी वेगवेगळ्या मतदार संघात जाऊन शासकीय कार्यक्रम घेणे, त्या ठिकाणचा आढावा घेणे व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे हा भाजपचा सध्याचा अजेंडा आहे. त्याप्रमाणे काम चालू आहे .महाराष्ट्रात आम्हाला राष्ट्रवादीचे मुळीच आव्हान नाही दोन्ही काँग्रेसची आघाडी असताना ६ आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढून ४ खासदार निवडून आले आहेत त्यामुळे त्यांचे आम्हाला मुळीच आव्हान नाही व ते आमचे टार्गेटही नाहीत असे दानवे यांनी स्पष्ट केले.

भाजप नेते नितेश राणे व शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वादावर बोलताना दानवे म्हणाले आमचे सर्व वाद आता मिटले आहेत.त्यामुळे आम्ही एकमेकांच्या नावाचा उल्लेख करणार नाही असे केसरकर यांनी स्पष्ट केले आहे,त्यामुळे तुम्हीही मागचे वाद सोडून द्या असेही रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी;

error: Content is protected !!
Exit mobile version