गोल पोस्ट महाराष्ट्र आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, राऊत यांचं फडणवीसांना प्रतिउत्तर

आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, राऊत यांचं फडणवीसांना प्रतिउत्तर

मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: मुंबईत व्यवसाय करायचा असंल तर ‘कराची स्वीट्स’ हे नाव बदला, असा इशारा शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी दुकान मालकाला दिला होता. या नंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी शिवसेनेला चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र, संजय राऊत यांनी तात्काळ ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यावर फडणवीसांनी वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, आधी पाकिस्ताननं बळकावलेला काश्मीरचा भाग पुन्हा भारतात आणा. कराचीचं आपण नंतर बघू.

“आम्ही ‘अखंड भारत’ संकल्पनेवर विश्वास ठेवतो. कराचीही एक दिवस भारताचा भाग होईल” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला होता. याला राऊत यांनी प्रतिउत्तर दिलं. नितीन नांदगावकर यांनी व्हिडिओ शेअर केल्या नंतर राऊत यांनी पष्टिकरण देखील दिलं होतं. ‘निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून उभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचं नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही,’ असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. आज या घटनेला एक वर्ष पूर्ण होतंय. याच विषयी बोलताना संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रातील भाजपच्या पुढाऱ्यांचं ताळतंत्र सुटलंय. पहाटेच्या शपथविधीला एक वर्ष झालं आहे. अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालंय. भाजप नेते भ्रमिष्ट झाले आहेत. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडं लक्ष देऊ नये, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version