बाय बाय २०१९… वेलकम २०२०

 

-प्रशांत श्रीमंदिलकर

२०१९ हे वर्ष बघता बघता संपले. या वर्षात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडल्या. या वर्षात अनेक महत्त्वाच्या घटनाही घडल्या. ज्या आपल्याकडे ऐतिहासिक स्थान निर्माण करून गेल्या. या वर्षात प्रत्येक क्षेत्रामध्ये महत्वाच्या घडामोडी घडल्याचे चित्र पहायला मिळाले. विविध क्षेत्रांत प्रचंड उलथापालथ पहावयास मिळाली. आता येणाऱ्या २०२० हे वर्ष सर्वांच्या आशा, अपेक्षा देणारे ठरावे हीच अपेक्षा. नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा.. गेल्या म्हणजे २०१९चा पाहू या थोडक्यात आढावा.

एकविसाव्या शतकातील २०१९ हे वर्ष अनेक अर्थानी महत्त्वाचे ठरले. या सरत्या वर्षात राजकीय क्षेत्रात अनेक चढ-उतार पाहावयास मिळाले. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या घोडदौड सुरू झाली. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही राज्ये भाजपच्या हातून गेली.

यंदाची लोकसभा निवडणूक गाजली ती भारताने पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मध्ये जाऊन केलेल्या ‘एअर स्ट्राईक’ने. भारतीय लष्कराने पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. यात वायुसेनेच्या विमानांनी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर बॉम्ब वर्षाव करून सुमारे ३०० ते ४०० दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. या कारवाईसाठी मोदी सरकारने लष्कराला मोकळीक दिली होती. त्यामुळे सैन्याने आपले काम चोख बजावले. ‘यह नया भारत हैं. यह घर में घुसेगा भी और मारेगा भी,’ असा संदेश पंतप्रधान मोदींनी ‘ना’पाक असलेल्या देशासह संपूर्ण जगाला दिला.

याच वर्षी महाराष्ट्रातही भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला राज्यातील जनतेने सत्तेसाठी जनादेश दिला. मात्र मुख्यमंत्रिपदावरून युती तुटली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी जुळवून घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनपेक्षितपणे मुख्यमंत्री झाले, तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जावे लागले.
नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर रखडलेल्या खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त नुकताच पार पडला. परंतु आता खरी या मंत्री मंडळाची कसोटी पहायला मिळणार आहे. परस्परविरोधी विचारसरणीची ही मंडळी कशी पुढे जातात हे नव्या वर्षात पाहायला मिळणार आहे. किंबहुना त्यावरच सरकारचे भवितव्य अवलंबून असेल.

या सगळ्या घटना घडत असताना मात्र लैंगिक अत्याचाराच्या असंख्य घटना देशात समोर आल्या. वर्ष संपायला आले असताना हैदराबाद, उन्नावमधील घटनांनी अवघा देश सुन्न झाला. वासनांध नराधमांची वाढत चाललेली मजल चिंतनाची बाब आहे. अशातच हैदराबादमधील आरोपींचे पोलिसांकडून एन्काऊंटर झाले. त्याचे जोरदार स्वागत झाले. यावर काहींनी प्रश्नही उपस्थित केले. आपल्या देशात प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे.परंतु पशूलाही लाजवेल असे कृत्य करणार्‍यांना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे. त्यांना दया, माफी नको. मानवी विकृतीला जरब ही बसलीच पाहिजे, जेणे करून पुढे असे दुष्कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही.

२०१९ मध्ये मोदी सरकारने वर्षभरात भ्रष्टाचार करणाऱ्याभोवतीचा फास आणखी आवळायला सुरुवात केली. गेली अनेक वर्षे भारतात भ्रष्टाचार बोकाळला होता. या भ्रष्टयाचारावरून अनेक बड्या मंत्र्यांना जेलची हवा खावी लागली. ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ ही घोषणा देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान मोदींनी विदेशात फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या देशांतर्गत मालमत्ता तर गोठविल्याच, शिवाय या आरोपींना जेरबंद करून भारतात आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची पावले उचलली. जनतेच्या पैशांची अफरातफर करणारी ही बडी मंडळींना अटक करण्यासाठी मोदी सरकारकडून आंतराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत.

याशिवाय भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने चंद्राकडे झेपावलेले यान शेवटच्या टप्प्यात अलगद उतरण्यात अयशस्वी ठरले आणि कोट्यवधी भारतीयांच्या हृदयाचा जणू ठोका चुकवून गेले. परंतु ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञ व वैज्ञानिकांनी ‘चांद्रयान-२ ’साठी खूप मेहनत घेतली होती. त्यानुसार या यानाने अचूक मार्गक्रमणही केले. परंतु शेवटच्या टप्प्यात विक्रम लँडर चंद्रावर वेगाने आदळला आणि यानाचा संपर्क तुटला. असे असले तरी यामुळे खचून न जाता ‘इस्रो’ने गगनयान ही नवी मोहीम हाती घेतली आहे. ती यशस्वी होण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकष्टा करीत आहेत.

यंदाच्या वर्ष हे भारताचा कर्णधार विराट कोहलीचा क्रिकेट वर दबदबा राहिला. क्रिकेटमध्ये विराटच्या टीमने मालिका विजय कायम राखताना अनेक नवीन विक्रमांना गवसणी घातली. तसेच वूमन टीम इंडियाच्या हरमनप्रीत कौर, मिताली राज यांचीही चमक दिसून आली. अन्य खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा बोलबाला राहिला. पी. व्ही. सिंधू, (टेनिस), मेरी कोम (बॉक्सिंग), द्युती चंद, हिमा दास (धावणे), फोगट भगिनी (कुस्ती) यांनी वर्ष गाजविले. तर सिनेसृष्टीत अनेक स्टारकिड्सचा उदय झाला. नवोदित तारे-तारका रूपेरी पडद्यावर आगमन करीत असताना सलमानचा काहीसा अपवाद वगळता खान बंधू बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवू शकले नाहीत. त्या तुलनेत रणबीर कपूर, टायगर श्रॉफ भाव खाऊन गेले. अभिनेत्रींमध्ये श्रद्धा कपूर, आलिया भट यांनी बाजी मारली. तसेच मराठी चित्रपटांनाही २०१९ मध्ये चांगला गल्ला जमवला. काही चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झाले.

पावसाने यंदाच्या वर्षात चांगलेच नुकसान केल्याचे पहायला मिळाले. राज्यात अतिवृष्टी व वादळांनी सर्वांनाच हैराण केले. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात तर महापुराने अनेक गावांना वेढा घातला होता. यात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. त्यात घरेच्या घरे वाहून गेली. कुटुंब उध्वस्त झाली. कित्येकांचे संसार उद्ध्वस्त होत असताना त्याहीपेक्षा जास्त हात मदतीसाठी सरसावले. अनेकांनी खारीचा वाटा उचलला. यातून माणुसकीचे दर्शन घडवले.

२०१९ या वर्षात अनेक चांगल्या वाईट घटनांचे आपण साक्षीदार आहोत. त्यामुळे येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगणं गरजेचं आहे. त्यासाठी एकमेकांना सावरून घेत सांभाळून घेत जगणं गरजेचं आहे. चांगले संकल्प करणं गरजेचं आहे. जेणे करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करता येतील. या सगळ्या गोष्टींचा आपण २०२० मध्ये पदार्पण करत आहोत.
Happy New Year 2020.                                                       

 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा