मुंबई, ८ एप्रिल २०२३: मुंबईत तीन दहशतवादी घुसले असून, त्यांच्या संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलनंतर मुंबईत अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात राजा ठोंगे नावाच्या व्यक्तीने कॉल केला. दुबईवरुन पहाटे तीन अतिरेकी मुंबईत आले असून, त्यांचा संबंध थेट पाकिस्तानशी असल्याचा दावा त्याने केला. यातील एकाचे नाव मुजीब सय्यद असून, त्याचा मोबाइल नंबर आणि गाडीचा नंबर त्याने पोलिसांना दिला आहे. तसेच या व्यक्तिंचा दोन नंबरचा धंदा असल्याचाही दावा कॉलरने केल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईत दहशतवादी हल्ल्याचे धमकीचे आणि बॉम्बस्फोट होणार असल्याची अफवा पसरवाणारे कॉल आणि मेसेजेस पोलिसांना येत आहेत. त्यामुळे हा आलेला कॉल अफवा आहे की या माहितीत काही तथ्य आहे, यांची पोलीस पडताळणी करत आहेत. अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर