जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणी बैठकीत छगन भुजबळांची मागणी

मुंबई ११ मे २०२३: जो पर्यंत ओबीसींची आकडेवारी कळणार नाही तो पर्यंत ओबीसी आपल्या हक्कापासून वंचित राहतील, यासाठी देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी उमुख्यमंत्री व समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केली. तसेच या जातनिहाय जनगणनेसाठी देशव्यापी आंदोलनाची गरज आहे, या आंदोलनासाठी तयार राहा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले की, सर्वच पक्षात जसे फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचे लोक आहेत, तसेच सर्वच पक्षात या विचारांचे विरोधक सुद्धा आहेत. मात्र आपण समता परिषदेच्या माध्यमातून फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार जनतेत पसरविणे हे चालूच ठेवले पाहिजे. आज राजकीय परिस्थिती बदललेली पाहायला मिळते मात्र अश्या परिस्थितीत देशात शरद पवार सोडले तर कोणताच नेता शाहू, फुले,आंबेडरांचे विचार पुढे नेताना दिसत नाही.

भुजबळांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना सांगितले की, समता परिषदेचा अजेंडा हा गरिबांचा, मागासवर्गीयांचा आणि दलितांच्या उधारासाठी आहे. त्यामुळे समता परिषद ही मागासवर्गीय, वंचित, दलीत घटकासाठी नेहमी लढत आली आणि इथून पुढे देखील लढत राहील. समता परिषदेची व्याप्ती आपण वाढवली पाहिजे. प्रत्येक घरात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार गेलेच पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने एकजुटीने काम करायला हवे. एकत्र राहिलात तरच ओबीसी घटकाला फायदा होईल, विखुरलेल्या ओबीसी घटकाच्या वाट्याला काहीच येणार नाही. माझ्या राजकीय वाटचालीत देखील मी ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढा दिला आणि तो शेवटपर्यंत देत राहील, असे ठाम मत देखील छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीच्या बैठकीला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह, प्रा. हरी नरके माजी आमदार पंकज भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापु भुजबळ, उपाध्यक्ष दिलीप खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रा. हरी नरके यांनी लिहिलेल्या “महात्मा फुले: पर्यायी समाजव्यवस्थेचे शिल्पकार” आणि “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले” (हिंदी) या दोन पुस्तकांचे प्रकाशन भुजबळांच्या हस्ते करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा