चंद्रपूर, २३ फेब्रुवारी २०२३ : चंद्रपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करून आयोगापुढे सादर करा, असे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत.
- काय आहे प्रकरण ?
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात जिल्हाधिकारी विनय गौडा यांना १६ फेब्रुवारीला आयोगापुढे हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते आयोगापुढे हजर झाले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने त्यांना अटक करुन २ मार्चपर्यंत आयोगापुढे सादर करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
दरम्यान, पाच महिन्यांपूर्वी विनय गौडा यांची जिल्हाधिकारी म्हणून चंद्रपुरात नियुक्ती झाली आहे. पाच महिन्याच्या काळात त्यांची कारकीर्द उत्तम राहिली आहे. या पाच महिन्यात त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची चर्चा झाली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.