मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर स्वत:च्या फायद्यासाठी – आदित्य ठाकरे

मुंबई, २५ सप्टेंबर २०२२ : महाआघाडी सरकार सत्तेतून गेल्यापासून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत अनेकदा गेले. मात्र, त्यांची ही दिल्लीवारी महाराष्ट्राच्या हितासाठी नव्हती. तर स्वत:च्या फायद्यासाठी होती अशी टीका माजी मंत्री, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वडगाव मावळ येथे झालेल्या जनआक्रोश मेळाव्यात केली.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारमुळे गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वडगावमध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. आदित्य ठाकरे म्हणाले, आजचा जनआक्रोश मोर्चा हा सर्वसामान्य तरुणांचा आवाज आहे. राज्यातील आणि मावळातील तरुण यांच्यात सरकारबाबत राग आणि आक्रोश आहे. महाविकास आघाडी सरकार असते तर वेदांत प्रकल्प मावळमध्ये आला असता आणि त्याचा जल्लोष आपण साजरा केला असता.

गेल्या दोन ते तीन महिन्यांत तरुणांना रोजगार मिळेल की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. वेदांताचे प्रमुख यांनी प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचे दुःख नाही, कारण महाराष्ट्र प्रगत राज्य आहे आणि आपण आपली जागा निर्माण केली आहे. देशातील रोजगार ज्यांना आपल्याकडे खेचून नेऊशी वाटतो त्या राज्याबाबत मला काही वाटत नाही. कारण प्रत्येक भागांचा विकास झाला पाहिजे. परंतु महाराष्ट्रमध्ये येणारा निश्चित प्रकल्प दुसरीकडे हलवणे अयोग्य आहे. महाराष्ट्राला आश्वासनांचे गाजर नको रोजगार हवा आहे. आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी पाठपुरावा करत आहे. राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर हलवले गेल्याने दोन लाख रोजगार हिरावले गेले आहे. ही घटना दुसऱ्या राज्यात घडली असती तर उद्योगमंत्री यांनी राजीनामा दिला असता, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा