गोल पोस्ट महाराष्ट्र केंद्र आणि राज्यसरकारच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शन

केंद्र आणि राज्यसरकारच्या विरोधात काँग्रेसचे निदर्शन

धाराशिव, ९ नोव्हेंबर २०२३ : केंद्रातील भाजप आणि राज्यातील खोक्याचे सरकार यांच्या गलथान कारभार व चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, महिलांवरील वाढते अत्याचार, शेतकरी विरोधी धोरणे, सामाजिक द्वेष, जातीय दंगली आदी कारणांमुळे राज्यातील जनता हैराण आहे. दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांचे जगणेच मुश्किल झाले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या आशीर्वादाने राज्यात अमली पदार्थाची ड्रग्स तस्करी खुलेआम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे तरुणांचे जीवन विशेषत: विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. याविषयी पालक वर्गांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. मात्र सरकार या बाबीकडे तीळ मात्र लक्ष द्यायला तयार नाही. या सर्व बाबींमुळे जनतेच्या मनातील खदखदत असलेला आक्रोश व्यक्त करण्यासाठी धाराशीव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करून तीव्र निदर्शने करण्यात आली.

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, कळंब, भुम व परंडा या तालुक्यात सरासरी पेक्षा पाऊस कमी झालेला असताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी यादीतुन हे तालुके वगळण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरसकट तात्काळ दुष्काळ जाहीर करावा, सर्व प्रकारच्या पिक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी, सोयाबीन दूध या पिकासह सर्व पिकांचे हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे, जंगली जनावरांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विशेष पीक विमा लागू करावा, अमली पदार्थाच्या तस्करी करणाऱ्यांवर कठोर कारवाई तसेच अमली पदार्थाचा नायनाट करावा, घरगुती वापरातील गॅस, डिझेल व पेट्रोलच्या वाढलेल्या किमती कमी कराव्यात, राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी तातडीने मोठ्या प्रमाणात नोकर भरती करण्यात यावी तसेच राज्यातील जनतेची जातीनिहाय जनगणना करून सर्व प्रकारच्या मागासवर्गीयांना आरक्षण लागू करण्यात यावे. या मागण्यांचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले.

या निदर्शनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.धीरज कदम पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कळंब तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, भूम तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, परांडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, जिल्हा परिषद मा.सदस्य प्रकाश चव्हाण, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास शाळू, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, महिला सरचिटणीस शिलाताई उंबरे, सुरेंद्र पाटील, जिल्हा सचिव अशोक बनसोडे, जिल्हा सचिव सरफराज काझी, प्रा.वसंत मडके, अमोल कुतवळ, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कफिल सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

error: Content is protected !!
Exit mobile version